Friday, 31 July 2020

शाहीर अण्णा भाऊ साठे

वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले  विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर! आज १ अॉगस्ट २०२० रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष संपत आहे... त्यांना मानाचा मुजरा... ! शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील वटेगावमध्ये १९२० साली त्यांचा जन्म झाला. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज मुंबईत पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्‍याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.
चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट. विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलीशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.
१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्‍या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली.सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.
१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्‍या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत.
मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.
लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात जगप्रसिद्ध झालेला हा कलाकार काही दुर्दैवी (वैयक्तिक कौटुंबिक) संघर्षांमुळे खचत गेला. त्यांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले.  मनाने खचल्यानेच १८ जुलै, १९६९ रोजी अण्णा भाऊंचे निधन झाले. त्यांच्या साहित्याच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायामुळे जो समाज शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्या समाजामध्ये आत्मविश्र्वास व प्रगतीची आस निर्माण केली.

लोकमान्य टिळक

भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व ! स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील विलक्षण तेजस्वी आणि तर्डेंदार व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. १८५६ चा रत्नागिरीतल्या चिखलगावचा त्यांचा जन्म आणि १९२० चा मृत्यू. या कालावधीतील बाळ ते लोकमान्य असा त्यांचा प्रवास भारताला नवचैतन्य देऊन गेला.

टिळकांचे मूळ नाव केशव असले, तरी लोकव्यवहारात त्यांचे बाळ हे टोपणनावच रूढ झाले. त्यांच्या शालेय जीवनातली शेंगांच्या टर्रेंलाची घटना, गणित फळ्यावर लिहून हात खराब करून घेण्यापेक्षा गणिते तोंडी सोडवण्याचा उपाय, संत हा शब्द सन्त, संत किंव सन्‌त अशा तीन पद्धतीनं लिहिला तर बिघडते कुठे असा शिक्षकांना केलेला खडा सवाल-या सगळ्या घटनांमुळे टिळक हुशार, बुद्धिमान पण काहीसे हट्टी विद्यार्थी अशा सदरात मोडले जात.
’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी प्रतिज्ञा प्रचंड आत्मविश्र्वासानं करणारी टिळकांसारखी व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणूनच घडत गेली. कॉलेजमध्ये विद्येबरोबरच शरीरसंपत्ती मिळवण्यात त्यांना जास्त रस होता. यामुळेच कदाचित पुढचे शारीरिक, मानसिक कष्ट ते सोसू शकले. १८७६ ला बी.ए., पुढे गणितात एम. ए., व नंतर एल. एल. बी. अशी उत्तम शैक्षणिक कारकीर्द असलेले टिळक.
लोकमान्यांनी १८८० साली विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांसमवेत सुरू केलेले न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण नावाने सुरू केलेला छापखाना, ‘केसरी आणि मराठा’ सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना- या सगळ्याच घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला.
’पारतंत्र्यामुळं आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही,’ अशी ठाम भूमिका लोकमान्यांची पर्यायानं केसरीची होती. नेमकी याविरुद्ध भूमिका आगरकरांची होती. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणाच होणे गरजेचे होते. यामुळे केसरीतच नव्हे तर अवघ्या देशात वैचारिक संघर्ष सुरू झाला. याची परिणीती आगरकरांनी केसरी सोडण्यात झाली.
केसरीतून (मराठी) आणि मराठातून (इंग्रजी) होणारे लोकमान्य टिळकांचे लेखन स्‍फूर्तिदायी आणि दिशादर्शक होते. केसरीतून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक, राजकीय परिस्थितीबाबत सजग करत राहिले. ’मराठा’सारखे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्यामागे-जो विचार केसरीतून  पोहोचवला जातो, तोच इंग्रजांपर्यंत आणि परप्रांतीय हिंदी लोकांपर्यंत जावा-ही भूमिका होती. रँडच्या खुनानंतर ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या केसरीतल्या अग्रलेखामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. स्वदेशी चळवळीबाबतचा ’गूळ का साखर’ हा लेख, ‘राष्ट्रीय मनोवृत्ती ज्यातून निर्माण होईल, ते राष्ट्रीय शिक्षण’ अशी केलेली व्यापक व्याख्या, त्यावर लिहिलेले लेख- या सगळ्यांतून समाज प्रगल्भ होत गेला. त्यांच्या जहाल लेखनाचा प्रभाव क्रांतिकारकांवरही पडला. टिळकांच्या विचारांच्या प्रभावातून स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चि. केळकर, कॉम्रेड डांगे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली.
लोकमान्यांच्या लेखनात बनावट, सजावट, अलंकाराची वेलबुट्टी नसायची, तर ते लेखन रोख-ठोक आणि अभ्यासपूर्ण असायचे. १९०० मध्ये प्रो. मॅक्सम्यूलर यांच्यावरचा त्यांचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. जर विद्वान मनुष्य असेल, मग तो विलायती असला, तरी त्याचे गुण घ्यावेत ही त्यामागची भावना होती. लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचे वक्तृत्वही धारदार होते. सामाजिक सहभागाचे महत्त्व जाणणारे ते विलक्षण प्रभावी संघटक होते. समाज एकजूट होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा श्रीगणेशा महाराष्ट्रात केला. या उत्सवांची सुरुवात हे खरे तर त्यांच्या असंख्य ‘संघटनात्मक’ कामांपैकी एक काम. पण या एकाच कार्यातून त्यांच्यामधल्या अतिकुशल संघटकाची व द्रष्ट्याची जाणीव आपल्याला होते.१९०६ साली सुरू झालेल्या वंगभंग चळवळीत लोकमान्य टिळकांचा मोठा सहभाग होता. मराठी व बंगाली लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत पेटवावी हा विचार घेऊन त्यांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. कर्झनशाही विरुद्धची टीका, राष्ट्रीय सभेच्या कामासाठी लाल-बाल-पाल अशी एकत्र आलेली त्रयी, खामगाव-वर्धा-नागपूर-सोलापूर-मुंबई-मद्रास-कोलंबो असा टिळकांचा मोठा दौरा, कॉंग्रेस अधिवेशनातील अध्यक्षस्थान, होमरूल लीगची स्थापना, जहाल लेखांमुळे देशद्रोहाचे झालेले आरोप, तुरुंगवासाची शिक्षा या सगळ्यांमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली आणि त्यांची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढत गेली.स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्रीच्या साहाय्याने त्यांनी ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण केले व भारतीय जनतेत संघर्षाची भावना निर्माण केली.  ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात, अतिशय प्रतिकूल अशा हवामानात तब्बल ६ वर्षांची (१९०८-१९१४) शिक्षा भोगून परत आल्यानंतरही त्यांनी तेवढ्याच तडफेने कार्याला सुरुवात केली. राष्ट्रीय भावनेच्या विस्तारासह कॉंग्रेसच्या संघटनात्मक विस्तारातही त्यांचा शब्दश: ‘सिंहाचा’ वाटा होता. म्हणूनच त्यांचे कार्य म्हणजे केवळ ‘टिळक यांची कारकीर्द’ नसून, ते भारताला स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या जवळ नेणारे ‘लोकमान्य टिळक युग’ होते.
अशा या लोकप्रिय व्यक्तीची सर्वात प्रिय जागा कुठली असेल, तर ती म्हणजे पुण्याजवळचा सिंहगड. एकांताची व चिंतनाची भूक लागली असता खराखुरा एकांतवास ते सिंहगडावरच अनुभवायचे. तेथेच मनन, चिंतन आणि लेखनही करायचे. लोकमान्यांनी जे ग्रंथ लिहिले, त्या प्रत्येकात एकेक गुणविशेष आहे. ’ओरायन’ मध्ये गणिती आणि ज्योतिषविषयक ज्ञान आहे. ’आर्यांचे वसतिस्थान’ मधून संशोधन व विश्र्लेषण दिसते, आणि मंडालेच्या तुरुंगवासात लिहिलेल्या ‘गीतारहस्यात’सखोल तात्त्विक विचार वाचायला मिळतो.
लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, लेखणीची व वक्तृत्वाची धार हिंदुस्थानभर पोहोचली. केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहिलेली त्यांची प्रतिमा प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिली. जनतेने त्यांना ’लोकमान्य’ केले. त्याचबरोबर ते हिंदुस्थानातील (ब्रिटिशविरोधी) अस्वस्थतेचे जनक मानले गेले. खरे तर राष्ट्राचा अभ्युदय व्हायचा, तर ते राष्ट्र नेहमी अस्वस्थच असायला हवेहे लोकमान्य टिळकांनी केव्हाच जाणले होते. याच सकारात्मक अस्वस्थतेचा साक्षात्कार आपल्याला त्यांच्या जीवनकार्यातून होतो.


Wednesday, 29 July 2020

निसर्गसौंदर्य, खनिजसंपत्ती संपन्न: झारखंड

झारखंड-भारतातील 2000 मध्ये अस्तित्वात आलेलं एक राज्य. हे राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी बिहारचा एक भाग होते. राज्याच्या राजधानीचं शहर रांची. राजधानीचं स्वरूप आणि दर्जा मिळाल्यापासून या शहरात अनेक सुधारणा झाल्या आहेत. उंच उंच इमारतीदेखील इथे उभारल्या आहेत. रांची,धनबाद, बोकारो, जमशेदपूरसारख्या औद्योगिक प्रगतीनं वेढलेल्या शहरांनी झारखंडला एक वेगळं स्थान दिलंय. औद्योगिक प्रगतीमुळे व उद्योगधंद्यांमुळे शेजारच्या आसाम,पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, पंजाबसारख्या राज्यांतून असंख्य लोक इथं येऊन स्थायिक झाले. या प्रदेशातील मूळ निवासी अर्थात आदिवासी व आदिम जाती-जमातींनी जरी राज्याच्या प्रगतीत आपापला वाटा उचलला असला तरी ते स्वतःला पूर्णपणे या नवीन प्रवाहात मात्र झोकून देऊ शकले नाहीत. शहरीकरणापासून त्यांनी स्वतःला तसं दूरच ठेवलं. उलट मुंडा, संथाळ, असुर, उरांव, हो, खरवार, खडीया, परहिया, बिरहोरसारख्या आदिवासी जाती-जमाती दूर जंगलात आणखी खोलवर जाऊन वसल्या. काही जाती-जमाती तर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. काही आदिवासी जाती-जमातीच्या लोकांनी सरकारने दिलेल्या मदतीच्या व सवलतीच्या जोरावर आपली प्रगती व उन्नती साधली आहे. 
झारखंड ही विपुल निसर्गसौंदर्य आणि खनिज संपत्तीची भूमी आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक झारखंड वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ब्रिटिशांना भारतातून जाऊन आज 70 वर्षे उलटून गेली तरी झारखंडमध्ये आजही एक असं गाव आहे, त्या गावात फक्त अँग्लो इंडियन लोकांचीच वस्ती आहे. या गावाचं नाव आहे- मॅकलुसिगंज. रांचीपासून 55 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश येथून निघून गेले तरी काहींना इथल्या वास्तव्याचा मोह सुटला नाही. इथले भव्य बंगले व बागा पूर्वीच्या त्यांच्या विलासी जगण्याची साक्ष देत उभ्या आहेत. 
चांडील धरण ही झारखंडची सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना आहे. धरण बांधताना पाणीपुरवठा, वीजनिर्मिती, मत्स्यपालन, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवण्यात आले होते. 'उलगुलान' जागविणाऱ्या बिरसा मुंडाची झारखंड ही भूमी. या भूमीचं ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. ही भूमी कोळशानं समृद्ध आहे. असं म्हटलं जातं की, इथल्या जमिनीत 500 फूट खाली कोळसा जळत असतो. अनेक शतकांपूर्वी झालेल्या भूकंपांनी झारखंडला खजिनांनी मालामाल केलंय. कोळशानं झारखंडचं नशीबच पालटून टाकलंय. पण हा कोळसा 500 फूट जमिनीखाली जळताना झारखंडला आपल्या तप्त झळांनी तापवत असतो. इथल्या नक्षलवाद्यांचंही तसंच आहे. सामान्यजनांसाठी पाठराखण करण्याचं व्रत त्यांनी घेतलंय. पण या व्रताला हिंसा आणि दहशतवादाची किनार आहे. या आतंकाखाली झारखंड सतत बेचैन असतं. पलाश वृक्षांची लालभडक फुले आणि त्यांच्या नाजूक पाकळ्या, जोडीला मोहाची मादकता आणि मस्ती अनुभवत झारखंड खऱ्या अर्थानं जळत्या कोळशावर वसलंय.-मच्छिंद्र ऐनापुरे,सांगली 7038121012

दिल्लीतला लोधी गार्डन्स

80 एकरांवर पसरलेला लोधी गार्डन्स म्हणजे इतिहास आणि निसर्गसौंदर्य यांचा उत्तम मिलाफ आहे. दिल्लीतले हे लोधी गार्डन्स सर्वात आधी लेडी वेलिंगडन पार्क म्हणून ओळखला जायचा. या लेडी वेलिंगडन म्हणजे भारताचे गव्हर्नर जनरल वेलिंगडन यांच्या पत्नी. या बाईच्या पुढाकारानं ही गार्डन्स फुलवली गेली. स्वातंत्र्य मिळाल्यावर या गार्डन्सचं नामकरण लोधी गार्डन्स असं करण्यात आलं. इतिहास आणि वास्तुकलाशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही गार्डन्स महत्वाची आहेत. १५व्या आणि १६व्या शतकात बांधलेल्या इथल्या वास्तू अजून बऱ्यापैकी तग धरून आहेत. सय्यद घराण्याचा शेवटचा राजा महम्मद शाह आणि लोधी घराण्याचा राजा सिकंदर लोधी यांच्या कबरी इथे आहेत. सय्यद आणि लोधी या दोन्ही घराण्यांच्या फारशा वास्तू दिल्ली परिसरात नाहीत. त्यामुळे या दोन कबरीना इतिहाससंशोधकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. दोन कबरीबरोबरच इथे शिश गुम्बज आणि बडा गुम्बज आहेत. या दोन्ही वास्तू लोधी घराण्यानं १५व्या शतकात बांधलेल्या आहेत. लोधी रोडवरून जाताना मोहम्मद शाहची कबर दिसते. ही अष्टकोनी कबर आहे आणि रात्रीच्या वेळीसुद्धा ही वास्तू अतिशय सुंदर दिसते. याच गार्डन्समध्ये एक अतिशय टुमदार पूलही आहे. आठ खांबांवर उभारलेला हा पूल आठपुला म्हणून ओळखला जातो. हा पूल पूर्वी 'खैरपूर का पूल' म्हणून ओळखला जायचा.खैरपूर हे गाव होतं. या गावातल्या मंडळींना दुसऱ्या ठिकाणी हलवून इथे ही गार्डन्स विकसित केली गेली. त्या गावाची आठवण म्हणून तो खैरपूर का पूल! लोधी गार्डन्समधली झाडांची, फुलझाडांची विविधता जबरदस्त आहे. ८० एकर परिसरात हे गार्डन आहे आणि अर्जुन, चाफा, नीम, बकुळ, बाहावा, गुलमोहोर, शिशम, अशोक, कुसुम, जांभूळ अशी पाच हजारांहून जास्त वेगवेगळी झाडं इथे आहेत. बहुतेक झाडांवर नावाच्या प्लेट लावलेल्या आहेत. या गार्डन्समध्ये एक बांबूचं बन आहे. पाम झाडांचाही एक मोठा विभाग आहे. एका रेषेत डुलणारी पामची झाडं पाहायला मजा येते. इथे फुलझाडंही खूप प्रकारची आहेत. झाडं-फुलं आहेत म्हटल्यावर भरपूर पक्षीही आहेत इथे. सकाळच्या वेळेत तर पक्ष्यांच्या किलबिलाटानं सगळा परिसर गजबजून गेलेला असतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

10 अंक आणि राग यांची गंमत

'राग आला की दहा अंक मोज' असं आपल्याला कुणी तरी सांगितलेलं असतं. काहीजण हा उपाय करून पाहतात,परंतु राग काही गेलेला नसतो. मग दहा अंक मोजायला का सांगितलं जातं? यामागचं नेमकं रहस्य काय आहे? तर दहा अंक मोजायचे म्हणजे दहा श्वास मोजायचे. हे जर समजून सांगितलं तर तुम्हाला 10 अंकांचे रहस्य उलगडून मिळेल. अंक मोजणे हा रागावरचा फर्स्ट एड आहे. म्हणजेच तातडीने करावयाचा उपाय! 10 अंक मोजणे म्हणजे 10 श्वास मोजणे. तसं बघायला गेलं तर दहा अंक मोजायला गेलं तर दहा काय अगदी चार-पाच सेकंदही लागत नाहीत. तेवढ्यात राग जात नाही. यासाठी मोजून 10 श्वास घ्यावे लागतील. राग आला की आपला श्वास बदलतो.आपण जोरजोरात नाकपुड्या फुगवून श्वास घेऊ लागतो. त्याऐवजी क्षणभर थांबून हवेचा आवाज होऊ न देता दीर्घ श्वास घ्यायचा आणि क्षणभराने उच्छवास सोडायचा. तोही हळूहळू. आणि सोडतानाही झटकन न सोडता हलकेच श्वास सोडायचा. एका अंकात श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया संथपणे झाली पाहिजे. श्वास सोडताना जरा अधिक वेळ घ्या. अशा रीतीने 10 श्वास घ्या. 10 दीर्घ श्वास आणि प्रदीर्घ उच्छवासामुळे श्वासनाचं नियंत्रण होतं. मेंदूला अधिक प्राणवायू मिळतो आणि रागामुळे शरीरात झालेला जीवरासायनिक बदल नॉर्मल येतो. आपण रागावलेलो असतो तेव्हा शरीरात जीवरासायनिक बदल होतात. शरीर अकारण उत्तेजित होते. या रासायनिक बदलामुळे भावनिक मेंदू चेतवला जातो आणि विचारशक्तीचं केंद्र असलेल्या कपाळामागील 'फ्रॉटल' मेंदूवर त्याचा ताबा होतो. विचार, तर्क, कार्यकारणभाव, योग्य-अयोग्य ठरवणाऱ्या मेंदूवर संतापाच्या रसायनांचा अंमल चढतो. साहजिकच विचार कुंठित होतो. आपण काहीतरी बडबडायला लागतो. आक्रमक होतो, या क्रिया अक्षरशः क्षणार्धात घडतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी संतापाच्या जीवरसायनामध्ये सत्व म्हणजे निमिषार्धात बदल व्हावा लागतो. केवळ श्वासांच्या नियंत्रणानं ते शक्य होतं. प्रत्येक श्वासाबरोबर मिळणाऱ्या प्राणवायूमुळे मेंदूत बदल घडतो. त्यासाठी मेंदूला प्राणवायूचा अधिक पुरवठा लागतो. मग आपलं मन रागाच्या कारणाचा विचार करणं सोडून देतं आणि शांत होतं. इतका साधा वैज्ञानिक विचार यामागे आहे. आपणही करून बघा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday, 27 July 2020

ए.पी.जे अब्दुल कलाम

ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्‍वरम येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतर% पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैज्ञानिक होते.
अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्‍वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या कॉलेजप्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या कॉलेजातून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ह्यनासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संबंध आला.
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण, पद्यविभूषण व १९९८ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक पर्शिमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
२00२ मध्ये कलाम राष्ट्रपती झाले. कलाम भारताच्या प्रजासत्ताक देशाच्या ११व्या अध्यक्षपदावर यशस्वी ठरले आणि २५ जुलै रोजी शपथ घेण्याआधी राष्ट्रपती भवनमध्ये दाखल झाले. ज्यांना राष्ट्रपती बनण्यापूर्वी भारत र%, भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळाला आहे, असे कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते.

सांगली जिल्ह्याची खास २२ वैशिष्टे

१) सांगलीत पुर्वी सहागल्या होत्या म्हणून या गावाचं नाव सहागल्ली वरून सांगली झालं अस म्हणतात. कानडी भाषेत संगळगी असं नाव होतं. त्याचा अपभ्रंश सांगली असा झाला अशीपण थेअरी आहे. पुर्वी मिरज हे पटवर्धनांच संस्थान होतं. त्यांनी सांगलीला आपलं संस्थान केलं. त्यांच्याच बंधूंनी तासगाव आपलं संस्थान केलं. पुर्वीच्या काळी सातारा जिल्हात सांगली यायचं. १ ऑगस्ट १९४९ पासून याची दक्षिण सातारा अशी वेगळी झाली आणि २१ नोव्हेंबर १९६० पासून सांगली जिल्हा उदयास आला. 

२) सांगली जिल्ह्याच नाव काढल्यावर पहिल्या प्रथम उल्लेख करावा लागतों तो या जिल्ह्याने लढलेल्या स्वातंत्र संग्रामाचा क्रांन्तिसिंह नाना पाटील, जी.डी बापू लाड़, नागनाथअण्णा नायकवडी, पांडू मास्तर, बर्डे गुरूजी, बाबूराव चरणकर, धोंडीराम माळी, नाथाजी लाड, गौरीहर सिंहासने, बाबूजी पाटणकर, जोशीकाका अशी प्रतिसरकारची मोठ्ठी फौज या जिल्ह्याने बांधली. ज्या क्रांन्तीकारकांनी देशाला क्रांन्तीची भाषा शिकवली ते सांगलीच्या मातीत इंग्रजांविरोधात लढले. अशाच क्रांन्तीकार्यात वसंतदादा पाटलांनी सांगलीचा जेल फोडून पलायन केले. इतिहासाच्या पानांवर प्रतिसरकारचा काळ म्हणजे सांगली जिल्ह्याचा सुवर्णकाळ म्हणता येईल असा होता. 

३) एकीकडे रक्तरंजीत लढ़ा तर दूसरीकडे नाट्यपंढरी अशी ओळख सांगलीने निर्माण केली. अर्वाचिन मराठी रंगभूमीवर पहिले नाटक सादर करण्याचा मान सांगलीकडे जातो. सीता स्वयंवर हे पहिले नाटक विष्णुदास भावे यांनी रचलं. सांगलीत ५ नोव्हेंबर १८४३ साली हे नाटक सादर करण्यात आलं. महाराष्ट्रात मराठी रगंभूमी दिन याच दिवशी साजरा केला जातों. अर्वाचिन रंगभूमीवर सुवर्णकाळ निर्माण करणारे नाटककार गोविंद बल्लाळ  देवल, कृष्णाजी खाडिलकर हे सांगलीचे. १८८७ साली सांगलीत सदासुख हे नाट्यगृह बांधण्यात आले. इथे बालगंधर्व व दिनानाथ मंगेशकर नाटक सादर करत असत. इतकच काय तर पृथ्वीराज कपूर यानी दीवार, पैसा अंशी हिंदी नाटकंही इथे सादर केली आहेत. दिनानाथ मंगेशकरांनी तर याच्याही पुढे जावून कृष्णार्जून युद्ध चित्रपट सांगलीच्या वास्तव्यात तयार केला पण आर्थिक गणित त्यांना मांडता आले नाही. लता मंगेशकर, आशा, उषा, ह्रदयनाथ यांचे बालपण देखील सांगलीतच गेलं.   

४) क्रांन्तीकारकांचा जिल्हा, नाट्यसंस्कृतीचा जिल्हा याच सोबतीने उद्योग व्यवसायाचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. सहकारासोबत खाजगी उद्योग इथे एकत्र नांदले. चितळे आणि किर्लोस्कर हे त्यापैकी महत्वाची उदाहरणं. किर्लोस्करवाडी हे देशातील पहिले उद्योगिक नगरी म्हणून आकारास आले. १९१० साली कुंडल जवळच्या मोकळ्या जागेवर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी कारखाना टाकून देशाला पहिला लोखंडी नांगर दिला. इथे स्वदेशी पहिले डिझेल इंजिन तयार करण्यात आलं. चितळेंनी भिलवडी स्टेशन या छोट्याशा गावातून आपला पसारा पुण्यापासून युरोपर्यन्त विस्तारला. त्यांच्यासोबतीनेच PNG गाडगीळ सराफ,  अनेक लहानमोठ्या कंपन्या या जिल्ह्यात आकारास आल्या.
) कुस्ती आणि बुद्धीबळ अस एकत्रित मिश्रण असणारं सांगली हे जगातलं एकमेव शहर असावं. कोल्हापूर संस्कृतीप्रमाणेच सांगलीच्या तालीम सुरवातीच्या काळात प्रसिद्ध होत्या. उत्तरोत्तर काळात तालमींना राजकारणाची किड लागली आणि कुस्तीपरंपरा गुंडगिरीकडे झुकत गेली. बुद्धीबळाचा वारसा या शहराला १५० वर्षांपासूनचा आहे. क्रीडामहर्षी भाऊसाहेब पडसलगीकर यांनी ही परंपरा पुढे नेत सांगलीस नावलौकिक मिळवून दिला. उत्तउत्तोम स्पर्धक तर सांगलीत घडलेच पण राष्ट्रीय स्पर्धा भरवण्याचा मान देखील सांगलीस मिळाला.

६) शास्त्रीय संगीत हा देखील सांगलीचा अविभाज्य घटक. एकीकडे पठ्ठेबापूरावांपासून ते काळूबाळूंपर्यन्त लोककला जपण्यात सांगली आघाडीवर राहिली तर दूसरीकडे शास्त्रीय संगीताचे माहेरघर राहिली. किराना घराण्याचे आद्य संस्थापक अब्दुल करीम खॉं यांची मिरज ही कर्मभूमी राहिली आहे. पं. विष्णू दिगंबर पलुसकर, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, विनायकबुवा पटवर्धन, निळकंठबुवा जंगम हे सांगली जिल्ह्यातले. मिरजेच्या उरसात संगीत महोत्सव आयोजित केला जातो. सतार, तंबोरा संवादिनी या तंतूवाद्यासाठी मिरज प्रसिद्ध असून १८५० पासून इथे ही वाद्य तयार केली जातात. मिरजेची सतारमेकर गल्ली यासाठी देशभरात प्रसिद्ध आहे.

७) जिल्ह्याच अजून एक वैशिष्ट म्हणजे मिरजेस हॉस्पीटलची नगरी म्हणून ओळखलं जातं. मिशन हॉस्पीटल सह बरीच मोठ्ठी हॉस्पीटल या शहरात आहेत. उत्तर कर्नाटकापासून ते रत्नागिरी, सिंधदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सोलापूरपर्यन्तचे रुग्ण इथे येत असतात. याच शहरातील वान्लेस हॉस्पीटलमध्ये देशातील पहिली ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. १८१२ साली अमेरिकन मिशनरीचे डॉ, विल्यम वान्लेस यांनी पाश्चात्य उपचार पद्धतीचा पाया रचला. १८९४ साली मिशन हॉस्पीटलची स्थापना करण्यात आली. डॉ. गोसावी यांच्या प्रयत्नातून कॅन्सरवर उपचार करणारे अद्यावत असे सिद्धीविनायक कॅन्सर हॉस्पीटल सांगली मिरज रोडवर उभा करण्यात आले. मिरजेच्या प्रत्येक गल्लीबोळातून हॉस्पीटलची रांग आहे.

८) या जिल्ह्याचं वेगळेपण म्हणजे पुर्व आणि पश्चिम सांगलीमध्ये जमिनअस्मानाचा फरक पडतो. पश्चिम दिशेने असणाऱ्या शिराळा, वाळवा या तालुक्यांमध्ये मुबळक पाऊस पडतो. कृष्णा वारणेच्या पाण्यामुळे हा भाग समृद्ध आहे मात्र तासगाव कवठेमहांकाळ पासून सुरू होणारा पुर्व भाग जत, आटपाडी, विटा हा कमालीचा दुष्काळी भाग आहे. अस सांगितलं जातं की जो जत जिंकेल तो जग जिंकेल. अशी परिस्थिती पुर्व भागाची आहे. मात्र इथले लोक पुर्वापार उद्योगधंद्यासाठी बाहेर पडले. गलाईकामगार म्हणून देशभर विस्तारले. त्यातून मुबलक अर्थाजन या भागाचे झाल्याचे दिसून येते.

९) सांगली जिल्ह्यात अनेक गोष्टी पहिल्यांदा घडल्या. उद्योग व्यवसाय, नाटक यांचप्रमाणे मुद्रिणसंस्कृतीचा पाया देखील सांगली जिल्ह्याने घातलेला दिसून येतो. १८०५ साली भगवतगिता पहिल्यांदा सांगलीत छापण्यात आली. नागरी भाषेतले मराठीतले पहिले ठसे निर्माण करण्याचा मान सांगलीस जातो.

१०) सर्कशीचे आद्यपुरूष विष्णुपंत छत्रे अंकलखोपचे. त्यांनी या भागात सर्कस चालू करून इथल्या लोकांना एक व्यवसायाचे एक वेगळे छत्र मिळवून दिले. एकट्या तासगाव भागातून त्या काळात सुमारे सत्तरहून अधिक सर्कस निर्माण झाल्या. भारतापासून युरोपपर्यन्त या सर्कसने आपला नावलौकिक केला. म्हैसाळचे देवळ, तासगावचे माळी, सांगलीचे कार्लेकर अशी सर्कस क्षेत्रातील फेमस मात्तबर लोकं.

११) भारतातील मोठ्ठया धरणांपैकी एक मातीच धरण म्हणून चांदोली धरण ओळखलं जातं. शिराळा तालुक्यात हे धरण आहे. शिराळा तालुका भातासाठी आणि नागांसाठी प्रसिद्ध तालुका आहे. इथे नागपंचमीला जिवंत नाग पूजले जात असतं. नागपंचमीच्या काही दिवस अगोदर इथले तरुण नाग शोधण्यासाठी जिल्हाभर भटकंती करत. नाग पकडून त्यांचे पूजन केले जात असे व त्यानंतर त्यांना पुर्वीच्याच ठिकाणी सोडले जात असे.

१२) शिराळ्याच्या शेजारी असणारा वाळवा तालुका फक्त नावापूरता वाळवा आहे. कृष्णा नदीची कृपा या तालुक्यावर राहिल्याने ऊसांचा सलग पट्टा या तालुक्याचं वैशिष्ट मानता येईल. गुंड व मारामारी करणाऱ्यांचा तालुका ही ओळख पुसून स्व. राजारामबापू पाटलांनी इथे शैक्षणिक क्रांन्ती घडवून आणली. याच चालुक्यातील आष्टा या गावातील यात्रा प्रसिद्ध आहे.

१३) पलूस आणि कडेगाव तालुका हे दोन्ही वेगळे तालुके असले तरी मतदारसंघामुळे हे एकत्र बांधल्यासारखेच आहेत. या तालुक्यात सागरेश्वर अभयारण्य आहे. भारतातील हे मानवनिर्मीत असणारे एकमेव अभयारण्य आहे. धों.म. मोहिते यांच्या पुढाकाराने औसाड माळरानावर अभयारण्य निर्माण झाले. त्याच प्रमाणे या तालुक्यात येणारे औदुंबर हे तिर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे.

१४) तासगाव तालुका ओळखला जातो तो द्राक्षांसाठी. इथे पावलोंपावली बेदाण्यासाठी उभारण्यात आलेली कोल्ड स्टोरज पहायला मिळतात. आशिया खंडातील बेदाण्यांसाठी प्रसिद्ध असे इथले मार्केटयार्ड आहे. शेतीतज्ञ प्र.शं.ठाकूर, श्रीपाद दाभोळकर (नरेंद्र दाभोळकरांचे बंधू), वसंतराव आर्वे, आबा म्हेत्रे यांनी या तालुक्याला द्राक्षभूमी म्हणून ओळख निर्माण करून दिली. तास-ए-गणेश ही द्राक्षाची जात इथेच तयार करण्यात आली.

१५) विटा-खानापूर तालुक्याचं वैशिष्ट म्हणजे इथे असणारे गलाई कामगार. सोने गाळण्याच्या व्यवसायात संपुर्ण भारतभर गलाई कामगार विस्तारले. श्रीलंकेपासूने ते श्रीनगरपर्यन्त विटा-खानापूरचा एकतरी माणूस आपणास हमखास भेटतो.  त्या त्या भागाशी एकरूप होवून त्यांनी आपल्या परिसराचा विकास केला.

१६) आटपाडी,कवठे-महांकाळ-जत अशा दुष्काळी भागाचं वैशिष्ट म्हणजे इथली माणसं व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडी या पुस्तकातील सगळी माणसं याच भागातली. इथे धनगर-लिंगायत व मराठा समाज तुल्यबळ असल्याने जातीचा सत्तासंघर्ष होत राहतो.

१७) भारतातलं पहिलं ग्रामिण साहित्य संमेलन भरवण्याचा मान सांगली जिल्ह्यातल्या औंदुबरला जातो. दरवर्षी मकर संक्रातीच्या दिवशी इथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. कवी संधांशू व कथाकार म.बा. भोसले यांनी सुरू केलेली परंपरा आजही अखंड सुरू आहे.

१८) जगातील पहिली कैद्यांची मुक्त वसाहत सांगली जिल्ह्यात आहे. औंधच्या पंतप्रतिनिधींनी या संकल्पनीची सुरवात केली व स्वतंत्र भारतात देखील ही वसाहत चालू राहिली. आटपाडीजवळ स्वतंत्रपूर नावाने ही वसाहत आहे. व्ही.शांताराम यांनी याच विषयावर दो आंखे बारा हाथ नावाचा सिनेमा तयार केला.

१९) जिल्ह्यातले प्रत्येक गाव आपल्या वैशिष्टपूर्ण जत्रा-यात्रांसाठी प्रसिद्ध आहे. मिरज इस्लामपूरचा ऊरूस, शिराळची नागपंचमी, तासगावचा गणपतीचा रथोत्सव, आष्टाची भावईची जत्रा, आरेवाडीची बिरोबाची जत्र, जतची जत्रा, कडेपूरचा ताबूत, विट्याची पालखी अशा अनेक जत्रा फेमस आहेत.

२०) सांगलीच नाव घेतल्यावर आठवण्यासारखी गोष्ट म्हणजे भडंग. सांगली आपल्या खास भडंगसाठी फेमस आहे. गोरे भडंग, भोरे भडंग, कपाळे भडंग, दांडेकर भडंग, गडकरी भडंग असे भडंग इथे फेमस आहेत.

२१) सांगलीच अजून एक वैशिष्ट म्हणजे इथली आमराई. सांगलीचा विकास झाला तो चिंतामणराव पटवर्धनांमुळे. त्यांच्या काळात सांगलीस प्राणीसंग्राहलय, शाळा, कॉलेज, रस्ते, पूल इत्यादी गोष्टी मिळाल्या. त्यांनीच विलिंग्डन कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार घेतला.

२२) हळद भवनचे पोहे, संबाची भेळ, रामनाथची बासुंदी, रहमैंत्तुलाची बिर्याणी, इस्लामपूरचा मसूर, विहारची पुरीभाजी अशा अनेक गोष्टी सांगलीची शान वाढवतात.

 सांगली जन्मभूमी व कर्मभूमी असणारे मान्यवर

नागठाण्याचे नटसम्राट बालगंधर्व, रेठरे हरणाक्षचे पठ्ठे बापूराव, यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव देवराष्ट्रे, अण्णा भाऊ साठे वाटेगावचे, क्रांन्तिसिंह नाना पाटील येडेमच्छिंद्रचे, शंकरराव खरात आटपाडीचे, गीतरामायणकार ग.दि.माडगुळकर व व्यंकटेश माडगुळकर हे माडगुळचे, उमा-बाबू, तात्या सावळजकर सावळजचे, मालेवाडीचे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, जनकवी पी. सावळाराम येडेनिपाणीचे, नागिण कथा लिहणारे लेखक चारूता सागर मळगावचे, बापू बिरू वाटेगावकर वाळवा बोरगावचे, शिवा-संभा,काळू-बाळू कवलापूरचे, वि.स.खांडेकरांची जन्मभूमी सांगली, आ.ह.साळुंखे खाडेवाडीचे. मारूती माने, क्रिकेटमधले विजय हजारे, बॅटमिंन्टनपट्टू नंदू नाटेकर हे सांगलीचे, क्रिकेटची स्टार स्मृती मंधना, फिल्मस्टार सई ताम्हणकर सांगलीची.

थोरा-मोठयांचे विचार

1) यशपयशाने जी निष्ठा कमी-जास्त होते ती खरी निष्ठाच नाही.- गोंदवलेकर महाराज 
2) भय आणि हव्यास यामुळे बुद्धीचा गैरवापर होतो.- निसर्गदत्त महाराज 
3) केवळ राख फुंकून अग्नी पेटत नाही, त्याप्रमाणे निव्वळ शब्दज्ञानाने खरे ज्ञान प्राप्त होत नाही.- संत ज्ञानेश्वर 
4) आपण आपल्या कर्तृत्वावर जोर देत गेलो तर आपले हक्क आणि अधिकार आपल्याकडे आपोआपच चालत येतात.- स्वामी रामतीर्थ 
5) शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान असते.- गोंदवलेकर महाराज
6) शिखरापर्यंत पोहचण्यासाठी पायापासून सुरुवात करा.-महावीर स्वामी 
7) आपले जीवन कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाइतके अस्थिर आहे.-आद्य शंकराचार्य 
8) चुकार लोकांची गणती करताना माणूस स्वतःला मोजायला नेमका विसरतो.- योगी अरविंद 
9) कर्तव्याचे विस्मरण होऊ नये याचीच केवळ काळजी असावी.-भाऊसाहेब महाराज (उमदीकर)
10) वेदांची अक्षरे पोथीत सापडतात तर वेदांचा अर्थ जीवनात शोधायचा असतो.-विनोबा भावे 
11) आयुष्य आनंदाने जगण्यासाठी त्याबाबतची आसक्ती सोडून द्यावी.- महात्मा गांधी
12) वेळ- संधी येईल म्हणून वाट पाहत बसू नका, ती आपल्या कर्तबगारीने आणा.- लोकमान्य टिळक 
13) देशाभिमानाचा अतिरेक हा देशभक्तीच्या अभावाइतकाच दूषणास्पद आहे.-स्वातंत्र्यवीर सावरकर 
14) वाईट माणसावर उपकार करणे हे चांगल्या माणसावर अपकार करणे इतकेच वाईट आहे.- व्यास 15) जे भूतकाळ वापरतात त्यांना लोकप्रियता मिळते तर जे भूतकाळ गाडतात त्यांच्या मनाला शांती लाभते.- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे 
16) खोटे बोलणाऱ्यास शिक्षा हीच की तो खरे बोलला तरी लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत.- भगवान बुद्ध 17) असत्य ही जिभेची मलिनता होय.-गुरू नानकजी 18) गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो आपोआपच बंड करेल.- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 
19) मी स्वतःलाच जेव्हा हसू शकतो, तेव्हा माझ्यावरील 'मी'पणाचे ओझे कमी होते.- रवींद्रनाथ टागोर 
20) चमत्कारांना शरण गेलेले मन संघर्षासाठी उठू शकत नाही.- डॉक्टर नरेंद्र दाभोळकर 
21) कसे बोलावे हे ज्याला कळते तो वक्ता, पण काय बोलावे हे ज्याला कळते तो विचारवंत.-गो.के.मनोळीकर
22) मनाचे तळमळे ।चंदनी ही अंग पोळे।।- संत तुकाराम 
23) पाकळ्या तोडून फुलांचे सौंदर्य काही कुणाच्या पदरात पडत नाही.- गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर 
24) सज्जनांनी समर्थ बनल्याशिवाय रामराज्य अवतरणार नाही.- डॉक्टर मुकुंदराव दातार

विचार करायला लावणारे विचार


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
१ )■ जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
_______________________________
२ )■ आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका.
_______________________________
३ )■ नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर *आत्मविश्वास* जिंकेल, आणि हारलात तर *अहंकार* हारेल.
_______________________________
४ )■ पाण्याने भरलेल्या तलावात *मासे* किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर *किडे* माश्याना खातात. *संधी* सगळ्यांना मिळते. फक्त आपली *वेळ* येण्याची वाट पाहा_____!
_______________________________
५ )■ एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं *हसू* आणि डोळ्यात थोडसं *पाणी* नक्कीच आलं पाहिजे____ !
_______________________________
६ )■ तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून *रडू* शकत नाही आणि स्वतःच स्वतःला आनंदाने *मिठी* ही मारू शकत नाही______ !
*आयुष्य* म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे_______ !
_______________________________
७ )■ जगातील सर्वात सुंदर रोपटे *विश्वासाचे* असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या *मनात* रुजवावे लागते______ !
_______________________________
८ )■ वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी *झुंज* देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.________ !
_______________________________
९ )■ जगातील कुठलीच गोष्ट *परिपूर्ण* नाही. परमेश्वराने *सोन* निर्माण केलं. चाफ्याची *फुल* सुद्धा त्यानीच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफयाचा *सुगंध*  नसता का देता आला ? अपूर्णतेतही काही मजा आहेच की._______ !
_______________________________
१०)■ दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.________!
_______________________________
११ )■ जेव्हा अडचणीत असाल तेव्हा *प्रामाणिक* रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा *साधे* रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा *विनयशील* रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा *शांत* रहा.________ !
_______________________________
१२ )■ आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस *माणूस* राहत नाही. परतून येत ते *चैतन्य*__________! 
_______________________________
१३ )■ *सोन्याची* एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीच *सोन* करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून *मोती* काढतात, तर काहीजण त्यातून *मासे* काढतात तर काहीजण फक्त *पाय* ओले करतात. हे *विश्व* पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे *महत्त्वाचे* आहे._______!
_______________________________
१४ )■ तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण *सत्य* चप्पल घालून तयार होईपर्यत, *खोट* गावभर हिंडून आलेलं असत._________!
_______________________________
१५ )■ प्रेमळ माणस तुम्हाला कधी *वेदना* देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची *काळजी* घेणं हाच असतो.
_______________________________
१६ )■ जगातील कटू सत्य हेच आहे की, *नाती* जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.________!
_______________________________
१७ )■ नेहमी लक्षात ठेवा की, " आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा *बडेजाव* करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही *पैसा* असला तरी पिण्याचे *पाणी* मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.____________!
_______________________________
१८ )■ पदाचा, संपत्तीचा कधीही *गर्व* करू नये.

Sunday, 26 July 2020

कोल्हापूर पर्यटन

निसर्गसौंदर्य, इतिहासाचा अमोघ ठेवा असलेलं शहर. विविधतेने नटलेले इथलं पर्यटन वैभव देशभरातील पर्यटकांना खुणावतं. तसं हे मध्यवर्ती ठिकाण. कर्नाटक आणि कोकणाशी जोडणारं. मराठय़ांची तिसरी राजधानी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरचे हे पर्यटनाचे वैभव अनुभवयाल हवं.
ऐतिहासिक गड-कोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्‍व विलक्षण आहे. दुर्ग, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्ये, हेरिटेज वास्तू, धरणे, जंगल सफारीची ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे. वस्तूत: साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच.
छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्तीपंढरी, गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल, रंकाळा तलाव, आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायचा असेल तर कोल्हापुरला पर्यटकांनी नक्की भेट द्यायला हवी. श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, पंचगंगा नदीघाट ही नेहमीची ठिकाणे. इथल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला रंकाळा तलाव. तलावाच्या मध्यभागी रंगभैरवाचे मंदिर. एका बाजूला संध्यामठ. पश्‍चिमेस असलेली शालिनी पॅलेसची वास्तू म्हणजे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे.
मग कलासक्त पर्यटकांना खुणावतात काही अनोखी ठिकाणे. राजारामपुरीतील मांडरे चित्रदालन, ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, दूध कट्टे पहायलाच हवेत. कोल्हापुरातून बाहेर पडलं की जोतिबाचं तीर्थक्षेत्र. डोंगरावर भिरभिरणारा वारा आणि सुखद गारवा देणारा किल्ले पन्हाळा. ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारा कणेरी मठ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरचे पुरातन मंदिर, गगनबावडा येथील रामलिंग हेही पर्यटकांना खुणावतात.
निसर्ग पर्यटनाला बाहेर पडलं तर मग कोल्हापूरपासून जवळचं गव्यांसाठी आरक्षित असलेले दाजीपूर अभयारण्य आणि भारतातील पहिले मातीचे धरण राधानगरीतले. चांदोली, आंबा, देवराई, मानोली, येळवण जुगाई, उदगिरी, दाजीपूर, बोरबेट, वाकीघोल, पेरणोलीचा सडा असं सह्याद्रीच्या कडेकपार्‍यांत फिरता येतं. पारगड, सामानगड, रांगणा, शिवगड, गगनबावडा, पावनगड, विशाळगड हे किल्ले इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत स्फुल्लींग चेतवतात.
श्री अंबाबाई मंदिर
पर्यटनाला निघालेला पर्यटक कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाही. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील मंदिर आहे. नगारखाना, प्रवेशद्वारे, दरवाजावरील घंटा, दगडी चौथरे आणि त्या वरील कोरीव काम प्रेक्षणीय आहे. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. भवानी मंडप, जुना राजवाडा परिसर हे आकर्षण आहे.
जोतिबा
वाडी र%ागिरी (ता. पन्हाळा) येथे हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून इथे केदारलिंग, केदारेश्‍वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. जोतिबाला घातले जाणारे खेटे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. जवळच यमाई मंदिर आहे. 
रामलिंग धुळोबा
कोल्हापुरपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर हातकणंगले जवळ रामलिंग, धुळोबी ही देवस्थाने आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा असून पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणपती मूर्ती आहे. देवालयाच्या बाहेरील बाजूस हेमाडपंथी शिल्प आहे. कन्नड भाषेतील शिलालेख असून थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे. याच परिसरात डोंगरमाथ्यावर अल्लमप्रभूचे देवस्थान मध्ययुगीन बांधणीचे आहे.
खिद्रापूरचे कोपेश्‍वर
शिरोळ तालुक्यात कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर आहे. प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे हे मंदिर आहे. कोल्हापूरपासून ७0 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारा राशींचे बारा खांब आहेत. अत्यंत कोरीव नक्षीदार खांब, हत्ती, रामायण, महाभारतातील प्रसंग, राशीचिन्हे, प्राणी यांची कलाकुसर मंदिरावर आहे. 
विशाळगड, पारगड
कोल्हापुरपासून ९0 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. गडाच्या चोहोबाजूने मोठे खंदक आहेत. गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळनगरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. निसर्गाची उधळण असलेला पारगडा किल्ला चंदगड ते तिलारी मार्गावर आहे. 
चिरेबंदी पायर्‍या, डोंगरदर्‍या, हिरवीगर्द झाडी, निरव शांतता या परिसराचे वैशिष्ट्य आहे.
किल्ले पन्हाळगड
पन्हाळा किल्ला शिव छत्रपतींच्या आणि संभाजीराजांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. पुसाटी बुरुज, तबक उद्यान, नायकिनीचा सज्जा, तीन दरवाजा, धान्य कोठार, अंबरखाना, धर्मकोठी, हिरकणी बुरूज, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय या ठिकाणी आहे. 

भास्कर चंदावरकर

श्‍वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा असे गाजलेले चित्रपट आणि घाशीराम कोतवाल सारखी अजरामर नाट्यकृती संगीतबद्ध करणारे प्रयोगशील संगीतकार, प्रसिद्ध सतारवादक आणि अध्यापक भास्कर चंदावरकर यांनी रवीशंकर व त्याच्या पत्नी अन्नपुर्णा देवी यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचं शिक्षण घेतलं.
त्यांचा जन्म १६ मार्च १९३६ रोजी झाला. चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणार्‍या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. त्यानंतर, त्यांना पश्‍चिमेकडचे संगीत खुणावू लागले होते. त्यामुळे टॉन द ल्यू, जोसेफ अँटोन रिडल आणि डिटर बॅच यांच्याकडून त्यांनी जॅझचे धडेही गिरवले होते. संगीतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी केलं. विशेष म्हणजे मा.प्रभा मराठे यांच्या दोन नृत्य नाटिकांसाठी दोन तासांचं दिलेलं संगीत चांगलंच गाजलं. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी १५ वषर्ं संगीत प्रशिक्षक म्हणून काम केले.
एकीकडे विद्यादानाचे काम सुरू असतानाच, १९७0 पासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. त्यापैकीच एक प्रयोग १९७२ मध्ये क्लिक झाला. विजय तेंडुलकरांच्या घाशिराम कोतवालला त्यांनी दिलेले संगीत मराठी नाट्यरसिकांना भावले. आपोआपच चित्रपटांचा भव्य पडदा खुला झाल्याने मा.चंदावरकर यांच्या प्रयोगशील वृत्तीला बहरच आला.मराठी, हिंदीसोबतच, पाश्‍चात्य चित्रपटांच्या पार्श्‍वसंगीताची जबाबदारीही त्यांनी उत्साहाने उचलली आणि ती यशस्वीपणे पेलली होती.
संगीतकार म्हणून घाशीराम कोतवालच्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर त्यांचा सामना हा सिनेमा चांगलाच गाजला. सामना मधली त्यांची गाजलेली गाणी रसिक र्शोते कधीच विसरू शकणार नाहीत. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे याच सिनेमातले गाणे.
भारतीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानं दिली. मा.भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे. अनेक भारतीय भाषांमधले सुमारे ४0 चित्रपट भास्कर चंदावरकरांनी आपल्या संगीतानं सजवले. मृणाल सेनचा खंडहर,अपर्णा सेनचा परोमा, अमोल पालेकरांचाथोडासा रुमानी हो जाए, विजया मेहतांचा रावसाहेब, जब्बार पटेलांचासामना, सिंहासन तसेच आक्रित, कैरी, मातीमाय हे त्यापैकी काही विशेष गाजलेले चित्रपट.
श्‍वास या चित्रपटासाठी चंदावरकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर संगीत नाटक अकादमी पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आले होते. घाशिराम कोतवाल हे नाटक, सामना, सिंहासन सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये मा.भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे. मा. भास्कर चंदावरकर यांचे २६ जुलै २00९ रोजी निधन झाले.

Saturday, 25 July 2020

सुंदर विचार- थोर व्यक्तींचे

1) तुम्हाला दुःख सहन करावे लागले तर समजा की तुम्ही जिवंत आहात.-ओव्हीड
2) तत्वज्ञानाचा अभ्यास वरवर केला तर संशय उत्पन्न होतात,पण सखोल अभ्यास करताच संशय थांबतात.- फ्रान्सिस बेकन
3) झऱ्याचे नदीत रुपांतर होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात; वाईट सवयीचेही असेच असते.-ओव्हीड
4) जे आवडते ते करा, त्यामुळे किमान एका व्यक्तीस खुश केल्याचे समाधान तुम्हाला मिळेल.- कॅथरीन हेपबर्न 
5) सर्वात आनंदी माणूस तो; जो कधीच स्वार्थी नसतो.- स्वामी विवेकानंद 
6) स्वतःमध्ये मोकळेपणा आणा म्हणजे आयुष्यही सोपे होऊन जाईल.- गौतम बुद्ध 
7) जोखीम घेण्यास इच्छुक नसल्यास आपल्याला सामान्य गोष्टीवर समाधान मानावे लागेल.- जिम रॉन
8)स्वप्न जादूतून सत्यात उतरत नाहीत, त्यासाठी दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम लागतात.- कॉलिन पॉवेल 
9) यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न मिळणे असा नसून अतिम अंतिम ध्येय गाठणे असा आहे.-एडविन सी बिल्स
10) कृती करण्यासाठी भक्कम कारणे असली की कृती ही सामर्थ्यशाली होते.-शेक्सपियर 11)पुस्तकापेक्षाही माणसाचा अभ्यास जास्त आवश्यक आहे.-लॉ. रोशे फुकॉल्ड
12) वाईट कृत्ये  हळूहळू सुखाचा पायाच उघडायला सुरुवात करतात.- स्वामी दयानंद
13) लोकांनी जय जयकार केले की डोके धुंद होते,मात्र समंजस माणसाच्या कौतुकाने हृदयाला आनंद होतो.- रिचर्ड स्टीले
14) तुमच्या भूतकाळाला तुमच्या वर्तमान काळावर अधिराज्य गाजवायला देऊ नका.-विल रॉजर्स
15) अति दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे ही ठेच लागण्याची दोन उत्तम कारणे आहेत.- विनोबा भावे 
16) क्रोधाच्या सिंहासनावर बसताच बुद्धी तिथून निघून जाते.- एम.हेन्री
17) जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत परमेश्वरावरही तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही.- स्वामी विवेकानंद 
18) मूल्यवान इतिहास तोच, जो आपण आज तयार करतो आहोत.- हेनरी फॉर्ड
19) सर्व उदात्त कार्यामागे त्याहून उदात्त विचार व विचारप्रणाली हवी.- विल्यम वर्डस्वर्थ
20) यशस्वी होण्याचा माझा संकल्प दृढ असेल तर मला कधीच अपयश येणार नाही.-ओग मंडिनो
21) जे लोक जगात मी, माझे या कल्पनांचे ओझे फेकून देतात, तेच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात.- शंकराचार्य 
22) भित्री माणसे खरा मृत्यू हे यापूर्वी अनेक वेळा मृत्यू पावतात.- विल्यम शेक्सपियर 
23) धीम्या गतीने जाणारा मनुष्य अशक्यतेच्या गावात अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो.-थॉमस कार्लाईल

Thursday, 23 July 2020

चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते.डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखर यांनी  सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना  अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखर यांनी  आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून  ते   "आझाद " हा आडनावाने ओळखले जाऊ लागले. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग , राजगुरू , सुखदेव यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू हे जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला. चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले; मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे, शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले. अत्यंत कमी वेळेत पोशाख , रूप बदलण्यात पारंगत असणारे ,  त्यांचा शौर्य , धाडसाची , पराक्रमाची अशी धास्ती ब्रिटिश पोलीसांना होती त्यांचा मृत्यू नंतर सुद्धा आठ तास    त्यांचा जवळ कोणीही जाण्याची धाडस करत नव्हते . भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले. 

कलेच्या जाणिवा पेरणारी बसोली

 लहान मुलांना वेगवेगळ्या कला माध्यमांची ओळख करून देणारी गेली 45 वर्षे अविरत चालणारी एक जुनी चळवळ आहे. तिचं नाव बसोली. दृककलेचं बालमनाशी नातं जोडणारी ही संस्था आहे. संस्थेचे सर्वेसर्वा चंद्रकांत चन्ने यांनी मुलांच्या मनावर गारुड केलं आहे. इथली मुलं मोठमोठाली चित्रं काढताहेत. त्यांना हवी तशी,हव्या त्या रंगात. इतकंच नव्हे तर इथे मुलं मातीच्या गोळ्याला आकार देतात. शिल्प रेखाटताहेत. वॉल पेंटिंग करतात.पथनाट्य, नाटुकली बसवताहेत, त्यांनीच बनवलेल्या बोलक्या बाहुल्या त्यांच्याच भाषेत बोलताहेत. गीत,क्राफ्ट, क्ले, अभिनय अशा कितीतरी प्रकारात मुलं रमतात.
इथं लहानग्यांच्या चित्रांचं कौतुक होतं. त्यांच्या चित्रांचं,शिल्पाचं मोठमोठ्या शहरांमध्ये प्रदर्शन भरवलं जातं. त्यांना भरभरून दाद मिळते. त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मानही मिळाले आहेत. मात्र या लहान मुलांना अधिक प्रिय असतो तो निर्मितीचा आनंद!यात चन्नेकाका,त्यांचे ताई-दादा हरवून जातात.चित्रनिर्मितीत वर्षभर गुंतून राहणारी ही मुलं रेषांमधून कधी निसर्ग दाखवतात तर कधी समाजाची स्पंदनं. कधी बालकवी, मर्ढेकर यांच्या कवितांचा गजर करतात. कवितेला चित्ररूप देतात. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत नागपूर आणि परिसरातील मुलं निवासी शिबिराचा आस्वाद घेतात. यआ शिबिरात मुलांना वेळेचा सदुपयोग, खेळ, स्वयंशिस्त, सहकार्य, आपुलकी, सहानुभूती, मैत्री,जिव्हाळा, भावनिकता आदी गोष्टी सहज शिकायला मिळतात. याशिवाय आजी-आजोबांचा मेळावा, नाट्यखेळ, बाहुला-बाहुलीचं लग्न, राऊंड एक्सप्रेशन्स ,इनोसंट कॅनव्हास या उपक्रमांमुळे मुलांची कृतीशीलता आणि कल्पनाशक्ती वाढते. मध्यंतरी ही लहान मुलं थेट रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये जाऊन आली. तिथं त्यांच्या चित्र प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. इतकेच नव्हे तर बसोलीच्या बालचित्रकारांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कवितांवर चित्र साकारले होते. डॉ. कलाम यांनी यातील ५० चित्रे विकत घेऊन राष्ट्रपती भवन येथे सजविली.  बालचित्रकारांना दिल्लीला बोलावून राष्ट्रपती भवनात त्यांचा सत्कार केला, त्यांच्यासोबत जेवण केले. बसोलीच्या चिमुकल्यांची सहा शिबिरे लंडन व सहा शिबिरे पॅरिसला आयोजित करण्यात आली होती.
आपल्या मुलाचं भावविश्व समृद्ध व्हावं, ज्ञान आणि कौशल्य शिकून तो परिपूर्ण व्हावा, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. कलेच्या माध्यमातून ते साध्य करण्याचा प्रयत्न इथं होताना दिसतो. चंद्रकांत चन्ने गेल्या 45 वर्षात कितीतरी मुलांच्या सहवासात आहेत, होते. त्यांना काळासोबत उपक्रम बदलले, मुलांची कला,वृत्तीही बदलताना दिसल्या. श्री. चन्ने एके ठिकाणी म्हणतात की,अलीकडे तर हा मोठा बदल जाणवतो. सुरुवातीला समोर दहा चित्रं ठेवली तर लगेच कळायचं की, चित्र मुलाचं आहे की मुलीचं. पण आज मुलींच्या चित्रांच्या फटकाऱयांमध्येही बोल्डनेसपणा जाणवतो. त्यांची स्वतंत्र शैली, वेगळा ठसा चित्रात उमटलेला असतो. 
गेल्या 45 वर्षांमध्ये हजारो-लाखो विद्यार्थ्यांमध्ये कलेच्या जाणिवा पेरणारी ही आनंदयात्रा चंद्रकांत चन्ने या अवलियाने सुरू केली आहे.हिमाचल प्रदेशमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेले व भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडविणारे गाव म्हणजे बसोली. याच गावावरून चन्ने यांनी कलाजग निर्माण केले. आज यासाठी त्यांची तिसरी पिढी योगदान देत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Wednesday, 22 July 2020

धोंडूताई कुलकर्णी

२३ जुलै १९३७ रोजी कोल्हापूरात जन्मलेल्या धोंडुताई कुलकर्नींनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीताचे शिक्षण सुरू केले होते.धोंडुताईंचे वडील कोल्हापूरमध्ये शिक्षक होते. ते ग्वाल्हेर घराण्याचे चांगले जाणकार होते. वयाच्या आठव्या वर्षीं आकाशवाणीवर सादर केलेल्या गायनाच्या मैफिलीमुळे त्यांचे नाव संगीत क्षेत्रात खूपच गाजले. शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गायनकला सादर करण्याची संधी मिळाली.
त्या काळात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात अल्लादिया खाँ यांचे पुतणे नत्थन खाँ यांच्या सुरांनी मंदिरातील पहाट प्रफुल्लित होत असे. हे सूर कानावर पडावेत यासाठी लहानपणीच धोंडूताई मंदिरात जात असत. येथूनच त्यांचा कान आणि संगीता विषयीची जाण तयार झाली. धोंडूताईंना गाणे शिकवा, असे साकडे एके दिवशी त्यांच्या वडिलांनी नत्थन खाँ यांना घातले, आणि धोडूताई त्यांच्या शिष्या झाल्या. तीन वर्षांतच नत्थन खाँ यांनी मुंबईत स्थलांतर केल्यानंतर अल्लादिया खाँ यांचे पुत्र भुर्जी खाँ यांनी महालक्ष्मी मंदिरात संगीत सेवा सुरू केली, आणि धोंडुताईंच्या वडिलांनी त्यांची भेट घेऊन धोंडूताईंना शिकविण्याविषयी विनंती केली. सूर्योदयाबरोबर सुरू होणार्‍या या संगीत साधनेतून धोंडूताईंना आवाजाचा कस राखण्याचे कसब साधणे शक्य झाले. संगीताच्या शिक्षणासाठी धोडुताईंना शाळा सोडावी लागली. १९५0 मध्ये भुर्जी खाँ यांचे निधन झाले. तोपयर्ंत धोंडुताईनी त्यांच्याकडून संगीताचे सखोल ज्ञान आत्मसात केले होते. पुढे जवळपास सात वर्षे मार्गदर्शन नसतानाच्या काळात धोंडुताईंनी गाण्याच्या मैफिली सुरू केल्या. केसरबाई केरकर यांनी संगीत शिकण्यासाठी उत्सुक असलेल्यांना जाहीर निमंत्रण दिल्याने १९६२ मध्ये त्यांनी केसरबाईंना पत्र पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे गिरविण्याची इच्छा व्यक्त केली आणि धोंडुताई केसरबाईं केरकरांच्या शिष्या झाल्या. त्यांच्या संगीतावर केसरबाईंच्या शैलीचा प्रभाव जाणव होता. त्याविषयी धोंडुताई स्वत: आदरपूर्वक त्याचा उल्लेखही करीत असे.सांगीतिक आणि जीवनविषयक तत्वांच्या निष्ठेपायी त्यांनी कशाशीही तडजोड केली नाही. आयुष्यभर जे पटले, त्याचाच पाठपुरावा केला. संगीताच्या बाबतीत सांगायचे तर जयपूर अत्रौली घराण्याच्या परंपरेची शुद्धता जपली आणि वैयक्तिक बाबतीत, संगीताची सेवा करण्यासाठी अविवाहित राहिल्या.
संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल धोंडुताईंना १९९0 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांच्या शिष्यांनी त्यांची खूप सेवा करून गुरु-शिष्य परंपरेचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असल्याचे दाखवून दिले. १ जून २0१४ या दिवशी म्हणजे वयाच्या ८५ व्या वर्षी वृध्दापकाळाने धोंडूताई कुलकर्णींचे मुंबईत निधन झाले.

पार्किन्सन डिसीज

पार्किन्सन डिसीज हा एक मेंदूचा रोग आहे जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर परिणाम करतो. पार्किन्सनच्या आजाराचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांना होतो, ज्यामध्ये ६0 वर्षांवरील १00 लोकांपैकी एकाचा समावेश आहे. या आजाराचे प्रमाण वाढत आहे. भारतात या रोगाचे ६ ते ७ लाख रुग्ण आहेत आणि दहा वर्षानंतर हे प्रमाण दुप्पट होईल. पुरुषामध्ये याचे प्रमाण दीडपटीने जास्त आहे. तसेच गावातील लोकांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात दिसून येत आहे. पार्किन्सन आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. याशिवाय झोप आणि संज्ञानात्मक क्षमतेमध्ये व्यत्यय येतो. वेदना आणि पोटाचे विकार, बद्धकोष्ट्पणा. चिंता आणि नैराश्य आणि जीवनाची गुणवत्ता कमी होते. लवकर निदान आणि प्रभावी उपचारांपर्यंत पोहोचणे, रुग्णांना आराम मिळवून देण्यात आणि त्यांचे जीवनमान चांगले करण्यासाठी आवश्यक आहे.
२२ जुलै हा दिवस वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी वार्षिक जागतिक मेंदू दिन साजरा करीत आहे. यावर्षी, हा दिवस पार्किन्सन आजाराच्या आणि त्यांच्या काळजीवाहू लोकांचे जीवन सुधारण्यासंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी सर्मपित आहे. या कार्यात १२६ हून अधिक जागतिक संघटना सामील होत आहेत. पार्किन्सन रोग एक जागतिक समस्या आहे. 'पार्किन्सन रोगाने जगभरातील ७0 लाखाहून अधिक लोकांना प्रभावित केले. ते न्यूयॉर्क शहरातील लोकसंख्येइतकेच आहे. दज्रेदार न्यूरोलॉजिकल केअर आणि उपचारामुळे जीवन सुधारण्याच्या प्रयत्न सुरू आहे. पार्किन्सनच्या आजाराबद्दल आणि त्याच्या समाजावर होणार्‍या परिणामांबद्दल जागरूकता वाढविणे हे लक्ष्य आहे.  पार्किन्सन आजाराची सुरुवातीला लक्षणे ओळखली जात नाहीत. त्यामुळे २५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे होते. मेंदूचे आरोग्य यापूर्वी कधीही इतके महत्त्वाचे नव्हते जेवढे आज आहे. जागतिक मेंदू दिनाच्या दिवशी या विकाराविरुद्ध जेव्हा जागतिक एकजूट होईल, तेव्हा आम्ही जागरुकतेचे सार्मथ्य प्रदर्शित करू. पार्किन्सन रोगाचा अंत करण्याच्या उद्देशाने जगाला एकत्रित करून संशोधन करणे आवश्यक आहे.

Monday, 20 July 2020

दुबई: स्वप्नाहून सुंदर

दुबई म्हणजे युनायटेड अरेबियन एमिरेट्स. दुबई, शारज, अबुधाबी, फुजेरा, रासलखेमा,उमलक्वेन आणि अजमान ही सात छोटी छोटी राज्ये मिळून 'युनायटेड अरेबियन एमिरेट्स'बनले आहे. दुबई म्हणजे फक्त लक्झरी शॉपिंग, अल्ट्रामॉडर्न आर्किटेक्चर आणि एक नाइटलाइफ झगमगाटाचा जीवंत देखावा असे पूर्वी समीकरण होतं, पण आता तिथे निसर्गाचाही तितकाच आनंद आपल्याला घेता येतो. 'आलेन' (Alain) च्या डोंगरांचे सौंदर्य अवर्णनीय आहे. 'जबलहाफिन' च्या पायथ्याशी असलेली गरम पाण्याची कुंडे हीदेखील विलोभनीय आहेत. 'आलेन' च्या डोंगरावर लावलेली हिरवीगार हिरवळ तर पाहताच राहावी, अशी आहे. एखाद्या वाळवंटातील ही हिरवळ आहे, हे सांगूनही कोणाला खरे वाटणार नाही. शारजामधील 'नॅचरल हिस्ट्री म्युझियम', 'अनिमल सेंटर' ही तर आश्चर्यकारकच! म्युझियममध्ये पूर्वीचे वाळवंट, भूकंप, ज्वालामुखी कसे होत असत, हे दिसते.

Sunday, 19 July 2020

मंगल पांडे

मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते. ज्या वेळी १८४९ साली, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली, त्यावेळी ते २२ वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४ व्या बी. एन. आय तुकडीच्या ५ व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले.

रम्य ही स्वर्गाहून लंका

श्रीलंका म्हटलं की इथं आपल्याला गर्द झाडी, रम्य वातावरण अनुभवायला मिळतं. इथे रस्त्यावरून प्रवास करताना गर्द हिरव्या राई, दुतर्फा असंख्य नारळी, पोफळी, केळी डुलताना दिसतील. फणस लगडलेले दिसतील. सोनेरी रंगाचे भलेमोठे नारळ त्या हिरव्या पार्श्वभूमीवर नजरेत भरतात. कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी. इथून पर्यटनाला सुरुवात होते. महाओया नदीच्या काठी पिन्नावेला येथे आपल्याला हत्ती आणि त्यांची पिल्लं मनसोक्त अंघोळ करताना दिसतील. या ठिकाणी हत्तींसाठी खास वसतिस्थान उभारण्यात आलं आहे. कँडी हे डोंगराराजीत वसलेलं हिरवंगार गाव आहे. गर्द हिरव्या झाडीने वेढलेला,लांबलचक पसरलेला कँडी लेक शेवटचा सिंहली राजा श्रीविक्रम राजेसिंघे यांनी 1798 मध्ये बांधला.

Thursday, 16 July 2020

नील आर्मस्ट्राँग

२0 जुलै १९६९ रोजी चंद्रावर उतरणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्राँग यांच्या नावाची इतिहासात नोंद आहे. पण, अंतराळवीर बनण्याआधी आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते.
नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे टेस्ट पायलट म्हणून त्यांनी ९00 पेक्षा जास्त वेळा उड्डाण केले. आर्मस्ट्राँग यांनी जेमिनी मोहिमेदरम्यानही अंतराळ प्रवास केलेला होता.

|| महाराष्ट्रातील अभयारण्ये ||

---------------------------------------
▪️नरनाळा - अकोला
▪️टिपेश्वर -यवतमाळ 
▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद
▪️अनेर - धुळे, नंदुरबार
▪️अंधेरी - चंद्रपूर

▪️औट्रमघाट - जळगांव
▪️कर्नाळा - रायगड
▪️कळसूबाई - अहमदनगर
▪️काटेपूर्णा - अकोला
▪️किनवट - नांदेड,यवतमाळ

जुळे नारळ: कोको द मेर

मॉरिशस बेटाच्या उत्तरेस व मादागास्कर या आफ्रिकन बेटांजवळ हिंदी महासागरात सेशेल्स नावाचा एक छोटा देश आहे. या द्वीपसमूहात माहे हे बेट सगळ्यात मोठे आहे. अप्रदूषित समुद्र, सर्वत्र हिरवीगार जंगले, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा देश पर्यटकांना आकर्षित करतो. परंतु येथे महत्त्वाचं  म्हणजे 'कोको द मेर' नावाचे जुळे नारळ मिळतात.  बाहेरील कवच एक, मात्र आत दोन वेगवेगळे नारळ असलेले हे जुळे नारळ. विशेष म्हणजे कोको द मेर (coco de mer) हे झाड संपूर्ण जगात फक्त सेशेल्स या बेटावरच मिळते. इतरत्र उपलब्ध नाही. या नारळांचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. या झाडाची पूर्ण वाढ व्हायला 30 ते 40 वर्षे लागतात.

Wednesday, 15 July 2020

माधवी देसाई

माधवी रणजित देसाई यांचा जन्म २१ जुलै, इ.स. १९३३ रोजी कोल्हापूर येथे झाला. या मराठीतील एक लेखिका होत्या. त्या भालजी पेंढारकर आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या व रणजित देसाई या लेखकाच्या पत्नी होत्या. रणजित देसाई यांची आधीची पत्नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवर्‍यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित नाच गं घुमा हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या १५ कादंबर्‍या, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह आणि काही व्यक्तिचित्रसंग्रह अशी सुमारे ३५ पुस्तके आहेत.

शिराळ्याची नागपंचमी


३२ शिराळा हे सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील एक तालुक्याचे ठिकाण आहे. नागपंचमी याठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, मात्र आता न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमी उत्सव निसर्गप्रेमी व पर्यावरणवादी यामुळे बंधनात अडकला आहे. नागपंचमीवर न्यायालयाने बंधने आणली आहेत. जिवंत नाग पूजा, नागस्पर्धा, जीवंत नागाची मिरवणूक यावर बंधने आली आहेत.  न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळाकर बंधू  नागपंचमी साजरी करत आहेत. जरवर्षी प्रतिकात्मक नागाची पूजा करून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. 
नागावर जीवापाड प्रेम करणारी माणसं शिराळ्‍यात आहेत. शिराळा येथे नागपंचमी उत्सव हा धार्मिकता जोपासून विज्ञान निष्ठ पद्धतीने साजरा केला जातो.  कोणतीही अंधश्रद्धा नाही. शिराळयात कधीही नाग सापडला तर त्याला मारत नाहीत.  वन विभागाच्या देखरेखीखाली त्यास सोडून दिले जाते. नागावर जीवापाड प्रेम करणारी माणसं शिराळ्‍यात आहेत. आणि आज जगात शिराळ्‍याची ओळख जिवंत नागाची पूजा करतात यासाठीच आहे.

Sunday, 12 July 2020

शंकरराव चव्हाण : महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक!

दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा 14 जुलै हा जन्मदिवस. आज बरोबर 100 वर्षे झाली. त्यामुळे त्यांचा हा 100 वा जन्मदिवस सर्वत्र थाटामाटात साजरा होत आहे. आपल्या ५० वर्षांच्या सक्रीय राजकारणात त्यांनी स्वच्छ आणि शुद्ध चारित्र्याला आपार महत्त्व दिले. त्यामुळेच गंमतीने 'हेडमास्तर' असेही त्यांना संबोधले गेले.

Saturday, 11 July 2020

◾️प्रश्न मंजुषा ◾️

१) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६ २) ४ ३) ५ ४) ९
उत्तर :१
२) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २
३)  खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा ३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३
४) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा, वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे २) अहमदनगर 3) औरंगावाद ४) लातूर
उतर : ३

Friday, 10 July 2020

किक्रेट आणि अंधश्रद्धा

अंधश्रद्धा जशी तुमच्या माझ्यात आहे,तशी अनेक लोकांमध्ये आहे.प्रत्येक क्षेत्रात आहे. मात्र क्रिकेटमधली अंधश्रद्धा जरा वेगळीच आहे. सर्वात अंधश्रद्धा याच क्षेत्रात असल्याचे बोलले जाते. विशिष्ट क्रमांकाची जर्सी वापरणे, १३ नंबर अनलकी असतो असे मानणे. १११ नंबर हा महावाईट असतो असे पूर्ण क्रिकेट विश्वाचे मत आहे. असे म्हणतात की, तो ३ बेल्स नसलेल्या स्टंप सारखा आहे. म्हणूनच अंपायर डेव्हिड शेफर्ड इंग्लंड संघ १११ वर आल्यास एका पायावर थांबायचे. ऑस्ट्रेलियामध्ये ८७ नंबरला सैतानाचा नंबर मानतात. स्टीव्ह वॉ आपले पूर्ण करिअर खिशात लाल रुमाल ठेवून खेळला. जयसूर्या बॅटिंग करताना प्रत्येक बॉल खेळण्यापूर्वी आपल्या बॅटवरून हात फिरवायचा.लसीथ मलिंगा सुद्धा बॉल टाकण्यापूर्वी अनेकदा बॉलचे चुंबन घेताना दिसलाय.

Thursday, 9 July 2020

जगदीप

अभिनय आणि विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असणार्‍या जगदीप (सैयद इश्तियाक अहमद जाफरी) यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ८१ वर्षीय जगदीप यांना कॅन्सर आणि वृद्धत्वाच्या व्याधींनी ग्रासले होते. १९५१ मध्ये बी. आर. चोप्रांच्या ह्यअफसाना या सिनेमापासून जगदीप यांनी त्यांच्या फिल्म करियला सुरुवात केली. या सिनेमात जगदीप एक बाल कलाकार होते. यानंतर अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना, आर पार, दो बीघा जमीन आणि हम पंछी एक डाल के या सिनेमांतही त्यांनी भूमिका केल्या. १९५३ मध्ये बिमल रॉय यांचा - दो बिघा जमीन या चित्रपटातील त्यांची भूमिका त्यांना यश देऊन गेली. बलराज सहानी आणि निरुपा रॉय यांच्यासारखे दिग्गज कलाकार सिनेमात होते.

पद्मा गोळे

मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार पद्मा गोळे यांचा जन्म १0 जुलै १९१३ रोजी झाला.
पद्मा गोळे या मराठी कवयित्री पद्मा ह्या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतीपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कविता संग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी(१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह.

बा.भ.बोरकर

झिणिझिणि वाजे बीन----सख्या रे, अनुदिन चीज नवीन!!अशी सुंदर रचना करणारे ""गोमंतक पुत्र सर्व महाराष्ट्र ज्यांना ‘आनंदयात्री कवी’ म्हणून ओळखतो असे कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार. बा. भ. बोरकर यांचे आज पुण्यस्मरण( ८ जुलै इ.स. १९८४)बोरकरांचा जन्म गोव्यातल्या कुडचडे या गावी ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली.

Wednesday, 8 July 2020

आईस्क्रीमचा शोध

मित्रांनो,आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडतं. उन्हाळ्यात तर 'ठंडा ठंडा कूल कूल' आईस्क्रीम खाताना खूपच भारी वाटतं. पण या आईस्क्रीमचा शोध कुणी लावला, कसा लावला माहिताय का? सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये आईस्क्रीम तयार करण्यात आल्याचं म्हटलं जातं. 'बीबीसी'च्या एका अहवालात इ.स.200 च्या सुमारास दूध आणि भात यांपासूनचे गोठलेले मिश्रण चीनमध्ये तयार झाल्याची नोंद इतिहासात आहे. आताचे आईस्क्रीम होण्याअगोदरचा हा थंड पदार्थ आहे बरं का! असं म्हटलं जातं की, 13 व्या शतकात बर्फसुद्धा एक मौल्यवान गोष्ट होती. कारण आईस्क्रीम तयार करण्यात बर्फ मिळणं महत्त्वाचं होतं. पूर्वी युरोपात  बर्फ विहिरीत किंवा लाकडी पेटीत साठवला जात होता. मीठ आणि बर्फ यांच्या मिश्रणातून द्रव पदार्थ गोठवला जात असे. याचपद्धतीने आईस्क्रीम तयार केला जात असे. 20 व्या शतकापर्यंत म्हणजेच फ्रीजचा शोध लागेपर्यंत अशा प्रकारेच द्रव पदार्थ गोठवले जात. भारतातही अगदी अलिकडेपर्यंत पार्टी, समारंभाला आईस्क्रीमचे पॉट भाड्याने आणून आईस्क्रीम तयार केले जात असे.

संजीव कुमार

संजीव कुमार या नावाने प्रसिद्ध असलेला हरी जरीवाला यांचा जन्म सुरत येथे ९ जुलै १९३८ला झाला. हे हिंदी चित्रपटांमधील एक अभिनेता होते. इ.स. १९६0 सालातील हम हिंदुस्तानी या हिंदी चित्रपटाद्वारे त्यानी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आँधी, खिलौना (इ.स. १९७0), मनचली (इ.स. १९७५), शोले (इ.स. १९७५), अंगूर (इ.स. १९८१), नमकीन (इ.स. १९८२) इत्यादी लोकप्रिय चित्रपटांत त्याने प्रमुख भूमिका साकारल्या. संजीव कुमार यांचा जन्म गुजरातमधील सुरत येथे हरिहर जेठालाल जरीवाला म्हणून गुजराती कुटुंबात झाला. संजीवकुमारला दोन धाकटे भाऊ आणि एक बहीण आहेत. त्याचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आहे.

ताज्या घडामोडीवर प्रश्नोत्तरे

1)इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे?-इलेक्ट्रॉन
2) कोरोना (कोविड-19) आजाराची सामान्य लक्षणे
कोणती? -ताप, कोरडा खोकला, थकवा
3) कोविड-19 विषाणू मानवी शरिरात परिणाम दाखविण्यासाठी 14 दिवससुद्धा घेऊ शकतो. यालाच
काय म्हणतात? - इन्क्युबेशन पिरिएड
4) मानवाला बाधा पोहोचवू शकणाऱ्या कोरोना विषाणूची संख्या किती आहे?-सात
5) सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे, हे कोणत्या ऊर्जेचे रूप आहे? - ध्वनिऊर्जा

इतिहास-भूगोल सामान्य ज्ञान

1) कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाने देशातील उद्योगधंद्यांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपयांची तकतूद केली? - 20,000 कोटी रुपये
2) गरीब व कमजोर लोकांच्या आर्थिक विकासासाठी व कोविड आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने किती कर्ज भारताला मंजूर केले? -750 मिलियन डॉलर
3) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिन कधी साजरा केला जातो? – 27 जून
4) नाबार्डमध्ये भारत सरकारचा हिस्सा किती टक्के आहे? - 99 टक्के
5) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? - वॉशिंग्टन डी.सी.

Tuesday, 7 July 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
१) शांतीवन हे कुणाच्या समाधीचं नाव आहे?
२) इकेबाना हा प्रकार कशाशी संबंधित आहे?
३) कर्नाटक संगीताचे पितामह कुणाला म्हणतात?
४) फॅदोमीटरने काय मोजलं जातं?
५) 'सारे जहां से अच्छा' या गीताचे गीतकार कोण आहेत?
उत्तर : १) जवाहरलाल नेहरू २) फुलांच्या सजावटीशी ३) पुरंदरदास ४) समुद्राची खोली ५) कवी इक्बाल

गो.नी.दांडेकर

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (ज्यांना गोनीदा असेही म्हणतात) जन्म त्यांचा ८ जुलै १९१६ रोजी झाला. ते एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले.

Monday, 6 July 2020

महेंद्र सिंग धोनी

महेंद्र सिंह धोनी ला आज एक चांगला क्रिकेटर म्हणुन सर्वदूर ओळख आहे. एम.एस धोनी या नावाने तो सुपरीचीत आहे. क्रिकेट जगतात त्याने आपल्या भारताचे नाव सर्वदूर चमकविले आहे. लहान गावातून निघुन एक महान क्रिकेटपटु होण्यापयर्ंत धोनी ला अनेक संघर्षामधुन जावे लागले. या संघर्षामधुन निघाल्यानंतर तो आज या ठिकाणी पोहोचलाय. जगापुढे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरूवातीच्या काळात महेंद्र सिंह धोनी करता हा प्रवास एवढा सहज सोपा मुळीच नव्हता पण क्रिकेट विषयी त्याला प्रचंड प्रेम आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी या त्यांच्या जमेच्या बाजु ठरल्या म्हणुन त्याने आज हे यश मिळविले आहे.

माऊंट अबू

निसर्गरम्य आणि थंड हवेच्या प्रसिध्द ठिकाणांमध्ये माउंट अबूचा समावेश होतो. त्यामुळे या ठिकाणाला आवर्जून भेट द्यायला हवी. माउंट अबू हे राजस्थानमधलं थंड हवेचं ठिकाण. अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेलं अबू हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. माउंट अबू हे राजस्थानमधलं एकमेव थंड हवेचं ठिकाण. अत्यंत सुंदर आणि मनोहारी अबू आपल्याला ताजंतवानं करून टाकतं. माउंट अबूला पोहोचल्यानंतर नक सरोवराला भेट द्यायला हवी. पर्वतरांगांमध्ये वसलेलं असं हे ठिकाण आहे. चारही बाजूंनी पर्वतरांगा आणि मध्यभागी सुंदर सरोवर असं हे दृश्य डोळ्यांत साठवून घ्यायला हवं. एक हजार मीटर उंचीवरचं अडीच कलोमीटर लांबीचं हे सरोवर म्हणजे एक आश्‍चर्यच आहे. 

बाजीप्रभू देशपांडे

बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म इसवी सन १६१५ मध्ये झाला. त्यांची अचूक जन्मतिथी इतिहासाला माहित नाही. त्यांचा जन्म पुण्यातील भोर तालुक्यात झाला. लहानपणापासूनच ते खूप कुशलतेने दांडपट्टा चालवत असत. सुरुवातीच्या काळात बाजीप्रभू देशपांडे जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या चाकरीत होते.

ग्रामनवनिर्माणाचे पुरस्कर्ते संत तुकडोजी महाराज

महाराजांच्या कीर्तनाने आणि कार्याने असंख्य लोक प्रभावित झाले. महाराजांचे अनुयायी बनले होते. पण याचबरोबर दुसरीकडे काही विरोधकही निर्माण झाले. त्यांच्या लोकप्रियतेमुळे हे लोक अधिक चिडले. शेवटी हा माणूस ढोंगी असून बुवाबाजी करतो, लोकांची फसवणूक करतो असे पत्र या विरोधकांनी महात्मा गांधी यांना पाठवले. तेव्हा गांधीजींनी या महाराजांना स्वतः जवळ राहण्यासाठी बोलावून घेतले. महाराजांच्या सहवासाने व प्रतिभेने गांधीजी प्रसन्न झाले.भजन, किर्तनाने मंत्रमुग्ध झाले. ते महाराजांना पुन्हा पुन्हा भजन म्हणावयास लावत. या भजनाने गांधीजी इतके प्रभावित झाले की एकदा मौन सुटल्याचेही भान त्यांना राहिले नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला 'यह हमारे संत तुकड्या बाबा ' म्हणून महाराजांची ओळख करून देत. हे महाराज म्हणजे महाराष्ट्रातील आधुनिक संत, भक्त व समाजसुधारक तुकडोजी महाराज.

Saturday, 4 July 2020

सुनीता देशपांडे

सुनिता देशपांडे ह्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे आहे मनोहर तरी या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राची तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून दाद मिळाली. १२ जुन १९४६ साली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पुलं सोबत विवाहबध्द होऊन पुढे संसाराची धुरा आनंदाने व यशस्वीरित्या पेलली सोयरे सकाळ, प्रिय जी.ए., समांतर जीवन, मण्यांची माळ, याशिवाय मनातलं अवकाश हा सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह, २00४ ते २00६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकांमधुन प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.