Pages

Thursday, 9 July 2020

पद्मा गोळे

मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार पद्मा गोळे यांचा जन्म १0 जुलै १९१३ रोजी झाला.
पद्मा गोळे या मराठी कवयित्री पद्मा ह्या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतीपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कविता संग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी(१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह.

प्रीतीपथावर ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला,तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वत:च्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदश्री व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर,संपन्न निसर्ग प्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये!
स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. पद्मा गोळे यांचे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.

No comments:

Post a Comment