Saturday 2 November 2019

धोंडो केशव कर्वे

 (१८ एप्रिल १८५८ - ९ नोव्हेंबर १९६२). आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरूड व रत्नागिरी येथे. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फग्यरुसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली. पहिली पत्नी वारल्यानंतर (१८९१) त्यांनी पंडिता रमाबाईंच्या 'शारदा सदन' या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. महर्षी अण्णासाहेब कर्वे आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली.
या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले; पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी 'विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ' काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी १८९९ साली 'अनाथ बालिकार्शम'या संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे १९00 सालापासून हा आर्शम सुरू झाला. पुढे सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, या जाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्‍वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्री जीवनाशी संबंधित अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. वरील संस्थांखेरीज 'मुरुड फंड' (१८८६), स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला 'निष्काम मठ' (१९१0), ग्रामीण शिक्षणासाठी 'महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' (१९३६), जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला 'समता-संघ'(१९४४) आदी संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यांचे आत्मवृत्त १९१५ मध्ये प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे. आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात व विशेषत: स्त्रीशिक्षण, विधवाविवाह या बाबतींत कर्व्यांनी आपल्या आमरण कार्याने, चिकाटीने आणि ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला. या शतायुषी महर्षीचा गौरव भारत सरकारने पद्मविभूषण (१९५५), भारतरत्न (१९५८) या पदव्या देऊन केला. त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा एक अनुबोधपटही सरकारने काढलेला आहे.

No comments:

Post a Comment