Thursday 20 January 2022

प्रेरक घटना- भाषेवर प्रभुत्व


क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कटक शहरात झाला. त्यांच्या आईवडिलांना सहा मुली आणि आठ मुलगे होते.  सुभाषचंद्र बोस हे त्यांचे नववे अपत्य आणि पाचवे पुत्र होते.  सुभाषचंद्र लहानपणापासूनच हुशार होते. बंगाली भाषा सोडली तर त्यांना सर्वच विषयात चांगले गुण मिळायचे. ते बंगाली भाषेत कच्चे होते. एके दिवशी भाषा शिक्षकांनी वर्गातल्या विद्यार्थ्यांना बंगालीमध्ये निबंध लिहायला सांगितला. वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या निबंधाच्या तुलनेत बाल सुभाषच्या निबंधात अनेक त्रुटी निघाल्या. शिक्षकांनी वर्गातच या उणिवा सांगितल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी सुभाषची खिल्ली उडवली. वर्गातला एक मित्र सुभाषला म्हणाला,' तू मोठा देशभक्त असलास तरी तुझी मातृभाषेवरची पकड मात्र ढिली आहे.' 

त्या वर्गमित्राचं बोलणं बाल सुभाषच्या मनाला फार लागलं. आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा त्यांनी दृढनिश्चय केला. मातृभाषेत सर्वाधिक गुण मिळवण्याचा चंग बांधला. तो झपाटून कामाला लागला. मातृभाषेचे बारकावे जाणून घेतले. व्याकरणाचा अभ्यास केला. काही दिवसांतच त्याने बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले.

 वार्षिक परीक्षा झाली तेव्हा सुभाष फक्त वर्गातच पहिला आला नाही तर मातृभाषेतही सर्वाधिक गुण मिळवले. हे पाहून वर्गातले सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. वर्गातल्या मित्रांना सुभाषकडून जाणून घ्यायचे होतं की हे त्याला कसे शक्य झाले?  तेव्हा बाळ सुभाष म्हणाला, ' कोणतेही काम कठोर परिश्रम, समर्पणवृत्तीने आणि एकाग्रतेने केल्यास सर्व काही शक्य आहे.' यातून आपल्याला हा धडा मिळतो की आपण कोणत्याही विषयात कमकुवत असलो तरी त्या विषयात स्वतःला पूर्ण झोकून दिल्यास आणि मेहनतीने अभ्यास केल्यास त्यात आपण प्रभुत्व मिळवू शकतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 17 January 2022

रॉकेट इंजिनिअरिंग विशेषतज्ज्ञ:एस. सोमनाथ


विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हिएसएस)चे संचालक आणि इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ एस. सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  सोमनाथ हे रॉकेट इंजिनीअरिंग आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये तज्ज्ञ आहेत. तसेच त्यांनी कामाच्या प्रारंभीच्या काळात 'पीएसएलव्ही'वर काम केले आहे.  सोमनाथ 22 जानेवारी 2018 पासून 'व्हीएसएससी'चे प्रमुख होते.  त्यांची आता के. सिवन यांच्या जागी इस्रोचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम (केरळ) लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (एलपीएससी) च्या संचालकपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.  याव्यतिरिक्त त्यांनी पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही)च्या एकत्रीकरणासाठीच्या टीमचे नेतृत्व केले आहे.  अंतराळात जड उपग्रह पाठवणाऱ्या जीएसएलव्ही एमके-3 च्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

एक काळ असा ओढवला होता की, जीएसएलव्ही (जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल) भारतात तयार होऊ शकत नव्हते आणि पाश्चात्य देशांनी त्यासाठीचे तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला होता. अशा मोठ्या कठीण परिस्थितीत एस. सोमनाथ यांच्या प्रयत्नांमुळे भारत जीएसएलव्ही तंत्रज्ञान आणि त्याची आधुनिक आवृत्ती तयार करू शकला.

 सोमनाथ यांचा जन्म जुलै 1963 मध्ये झाला.  त्यांनी कोल्लमच्या टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (इंडियन स्पेस इन्स्टिट्यूट), बंगलोरमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे.  1985 मध्ये ते व्हीएसएससीशी जोडले गेले.  ते जून 2010 ते 2014 पर्यंत जीएसएलव्ही एमके-3 चे प्रकल्प व्यवस्थापक होते.  सोमनाथ हे जीएसएलव्हीसारख्या वाहनांचे सिस्टीम इंजिनीअरिंग, स्ट्रक्चरल डिझाइन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स आणि पायरोटेक्निकमध्ये तज्ज्ञ मानले जातात.

सोमनाथ यांच्या मते खासगी कंपन्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय अंतराळ क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे आणि भावी पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय अवकाश कार्यक्रमात बदल करण्याचीही गरज आहे.  अंतराळ बजेट सध्याच्या 15,000-16,000 कोटींवरून 20,000-50,000 कोटींपेक्षा जास्त करण्याची गरज व्यक्त करून ते म्हणाले, "अंतराळ बजेटमध्ये वाढ केवळ सरकारी निधी किंवा त्यांच्या पाठींब्याने होऊ शकत नाही, दूरसंचार सेवा आणि हवाई सेवा यांसारख्या क्षेत्रांत जसे बदल घडले तसे बदल या क्षेत्रातही व्हायला हवेत." यामुळे अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील आणि संशोधन आणि विकासात वृद्धी होऊ शकेल.

त्यांना सिनेमाची खूप आवड आहे. ते एकेकाळी तिरुवनंतपुरममधील फिल्म सोसायटीचे सदस्यही होते.  ते खूप चांगले वक्ते आहेत आणि त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून व्याख्यानेही दिली आहेत.  त्यांच्या पत्नीचे नाव वलसाला असून त्या जीएसटी विभागात काम करतात.  त्यांना दोन मुले असून दोघांनीही अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Tuesday 11 January 2022

चिमुरडीने केला 'लिंगाणा' सर


मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारण्यात त्यांच्या आई-वडिलांचं योगदान महत्त्वाचं असतं. मुलाला संस्कारशील, धाडसी, भयमुक्त आणि सर्वगुणसंपन्न बनवणं पालकांचं कर्तव्य आहे. मुलं त्यांच्या भावी आयुष्यात कुठेच कमी पडू नयेत,याची पुरेपूर काळजी मुलांच्या लहानपणापासूनच घेतले पाहिजेत.तसे संस्कार दिले गेले पाहिजेत. आजचे पालक त्याबाबत सतर्क असल्याचेच आरोही लोखंडे या चिमुरड्या मुलीच्या पराक्रमावरून दिसून येते.  गिर्यारोहणाची जबदरस्त आवड असणाऱ्या साताऱ्याच्या सहा वर्षाच्या आरोही सचिन लोखंडे या चिमुरडीने  अलिकडेच दुर्गम चढाईचा एक हजार फूट उंचीचा लिंगाणा सर केला आहे. विशेष म्हणजे तिने हा पराक्रम पारंपरिक नऊवारी साडी नेसून केला आहे.हे कौतुकास्पदच म्हटले पाहिजे.

 लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. लिंगाणा समुद्रसपाटीपासून 3 हजार 100 फूट उंचीवर लिंगाणा दुर्ग आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका असल्याने त्याला लिंगाणा हे नाव पडले आहे. चढाई अतिशय दुर्गम असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्वात अवघड ट्रेकमध्ये याची गणना होते. सातारा जिल्ह्यातल्या कामेरी गावात राहणाऱ्या आरोही लोखंडे हिने नववर्षाच्या सुरुवातीलाच रविवारी लिंगाणा सर करून तिरंग्याला मानवंदना दिली. तिच्यासोबत तिचे वडील सचिन लोखंडे होते. पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचर यांच्या मार्गदर्शनातून लिंगाणा मोहीम 

आयोजित करण्यात आली.

 आरोही अगदी लहान असल्यापासून वडिलांसोबत ट्रेकिंगला जाते. ती सध्या पहिलीत शिकत आहे. आतापर्यंत  तिने वडिलांसोबत 26 किल्ल्यांना तिने भेट दिली आहे. शिवाय लिंगाणासह चार सुळकेही तिने सर केले आहेत. वजीर, वानरलिंगी, तैलबैल या सुळक्यांवर ती पोचली आहे. अतिशय धीटपणे आणि उत्साहात ती मोहिमेमध्ये सहभागी होते, असे तिचे वडील सचिन लोखंडे सुळके यांनी सांगितले. 

आजचे पालक आपल्या पाल्याला काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करीत आहेत,यासाठी स्वतः मेहनत घेताना दिसत आहेत. मुलांनी पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपली प्रगती करावी, यासाठी त्यांचा खटाटोप चालू असतो, हे  उद्याच्या देशाच्या भविष्यासाठी नक्कीच  आशादायी आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Friday 7 January 2022

जगातल्या अद्भुत गावांची ओळख

जगात पुतळ्यांचे असे एक गाव आहे, जिथे माणसांपेक्षा अधिक पुतळ्यांची संख्या आहे. त्याचबरोबर अशी काही गावे आहेत जी खणीत किंवा खड्ड्यात वसलेली आहेत. आता असे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण  हे जगच असं अद्भुत आहे की इथे सर्व काही शक्य आहे. चला, जाणून घेऊया अशा काही गावांविषयी! 


नागोरो: पुतळ्यांचं गाव

रानातल्या पिकांच्या रक्षणासाठी, पक्षी आणि प्राण्यांना घाबरवण्यासाठी अनेकदा गावातील शेतात बुजगावणी (एक प्रकारचे पुतळे) उभी केली जातात.  पण जपानमध्ये एक असं पुतळ्यांचं गाव आहे, तिथे तुम्हाला सगळीकडे पुतळेच पुतळे दिसतील. या गावाचं  नाव आहे नागोरो. फार पूर्वी  या गावाची लोकसंख्या 300  होती. या गावातले बहुतेक लोक शहरात स्थायिक झाले होते.  त्सुकिमी अयानो नावाची एक स्त्री एकदा आपल्या वृद्ध वडिलांना भेटायला गावात आली. तेव्हा तिला गाव अगदी निर्जन दिसलं. एक दिवस त्सुकिमीने शेतात स्कॅरेक्रो (मानवासारखा दिसणारा जपानी पुतळा) बनवून उभा केला. गावकऱ्यांना वाटलं की  शेतात कुणीतरी माणूस उभा आहे.  यानंतर त्सुकिमीने गावातील उजाडपणा दूर करण्यासाठी आणखी काही पुतळे जागोजागी उभा केले. 35 च्या आसपास वृद्ध लोकसंख्या असलेल्या या गावात आज 350 हून अधिक पुतळे उभे केले गेले आहेत.  शेतात, गावातल्या रिकाम्या घरांजवळ, अंगणात, रस्त्यावर, बस स्टँडवर, किराणा दुकानासमोर, रस्त्यांच्या कडेला असे पुतळे (स्केअरक्रो) पाहायला मिळतात. याशिवाय शाळेमध्येही स्कॅरेक्रो म्हणजेच मुले आणि शिक्षकांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.  आज जपानमधील अनेक लोक आपल्या मुलांसह या अनोख्या पुतळ्याच्या गावाला भेट देण्यासाठी येतात. साहजिकच  मुले,पालक हे  पुतळे पाहून आनंदून जातात.


कूबर पेडी: खाणीमध्ये असलेले गाव

 गावे सहसा जमिनीवर किंवा डोंगर माथ्यावर वसलेली असतात.  पण जगात एक गाव असे आहे की जिथे लोक खाणीत राहतात.  ऑस्ट्रेलियात असलेल्या या अनोख्या गावाचे नाव कूबर पेडी आहे.  या गावात ओपल दगडाच्या खाणींची संख्या सर्वाधिक आहे.  म्हणूनच कूबर पेडीला 'जगातील ओपल कॅपिटल' म्हणूनही ओळखले जाते.  हे ठिकाण वाळवंटी क्षेत्रात येते. उन्हाळ्यात येथील तापमान खूप जास्त असते. अशा परिस्थितीत येथील रहिवासी रिकाम्या खाणीत राहतात.  कूबर पेडीची बहुतेक लोकसंख्या भूमिगत खाणींमध्ये राहते, कारण खाणीमध्ये बांधलेल्या घरांना उन्हाळ्यात एसीची गरज नसते आणि हिवाळ्यात हीटरची गरज नसते.  मैदानाच्या आत बांधलेल्या घरांमध्ये सामान्य घराप्रमाणे सर्व सोयीसुविधा आहेत.  त्यात दुकाने, चर्च, पुस्तकांची दुकाने आणि हॉटेल्सपासून ते शाळांपर्यंत. किती अद्भुत आहे ना!


मत्माता: जमिनीखालील खड्ड्यातलं गाव

 कुबरपेडीमधले लोक जमिनीखाली रिकाम्या पडलेल्या खाणीत राहतात.  पण जगात असे एक गाव आहे, जिथे लोक शतकानुशतके जमिनीच्या आत खड्डे करून राहत आहेत.  ट्युनिशियाच्या दक्षिण भागात असलेल्या या गावाचे नाव मत्माता आहे.  मत्माता गावातील भूगर्भातील घरे जमिनीपासून कित्येक फूट खाली एका मोठ्या गोल खड्ड्यात आहेत.  मोठा गोलाकार खड्डा एक विशाल अंगण म्हणून काम करतो.  अंगणाच्या एका बाजूने वर जमिनीवर जाणासाठी गच्ची वाट आहे.  त्याच वेळी, जमिनीपासून वेगवेगळ्या दिशांना असलेल्या बोगद्यांमध्ये, लहान मुले, वृद्धांच्या खोल्या, सामान इत्यादी ठेवण्यासाठी स्टोअर रूम आहेत.  खड्ड्यात प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे स्वतंत्र घर आहे.  प्रत्येक घरामध्ये खोल भूमिगत बोगदे आहेत, जे काही अंतरावर असलेल्या इतर घरांशी एकमेकांशी जोडलेले आहेत.  जेणेकरून कडक उन्हात, पावसात एकमेकांच्या घरापर्यंत सहज पोहोचता येईल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Wednesday 5 January 2022

लोकेश राहुल : निलंबनापासून कर्णधारपदापर्यंतचा प्रवास


तीन वर्षांत निलंबनापासून कर्णधारपदापर्यंत प्रवास करणारा लोकेश राहुल आता भारतीय क्रिकेट विश्वातला एक चर्चित चेहरा बनला आहे.  त्याची सात वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली असली तरी त्याच्या कामगिरीची यादीही तशी मोठी आहे.  त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खेळामुळे आता निवड समितीने त्याला संघाचे नेतृत्व बहाल केले आहे.

रोहित शर्मा पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला नसल्याने राहुल आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेत भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणार आहे.  आगामी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने 19, 21 आणि 23 जानेवारी रोजी पार्ल आणि केपटाऊन येथे खेळवले जाणार आहेत.

भारतीय संघात आत -बाहेर करत राहिलेल्या राहुलच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट जानेवारी 2019 मध्ये आला, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याच्यावर 'काफी विथ करण' या चॅट शो मध्ये महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बंदी घालण्यात आली.  प्रशासकांच्या समितीने (सीओए) ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान स्थगिती दिली आणि त्याला मायदेशी परतावे लागले. 'सीओए'ने राहुल आणि पांड्यावरील निलंबन दोन आठवड्यांनी रद्द केले असले तरी त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडावे लागल्याने न्यूझीलंड दौऱ्यावर जाता आले नाही. 18 एप्रिल 1992 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेल्या राहुलचे वडील के.एन. लोकेश आणि आई राजेश्वरी दोघेही प्रोफेसर आहेत, पण जेव्हा राहुलने वयाच्या 10 व्या वर्षी बॅट हाती घेतली तेव्हापासून क्रिकेट हेच त्याचे पहिले प्रेम बनले.

राहुलला 2010 च्या आयसीसी अंडर-19 विश्वचषकात प्रथमच मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.  न्यूझीलंडमध्ये झालेली ही स्पर्धा भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली आणि संघ सहाव्या स्थानावर राहिला.  त्याच वर्षी राहुलने कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

राहुलने 2016 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि हरारे स्पोर्ट्स क्लब येथील पदार्पणाच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यातच शतक झळकावणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला.  सलामीवीर म्हणून पहिल्या कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय डावात शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे.  याच दौऱ्यात राहुलला टी-20 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचीही संधी मिळाली.  पदार्पणाच्या सामन्यात तो खाते उघडण्यात अयशस्वी ठरला, परंतु त्याने त्याच वर्षी 27 ऑगस्ट रोजी लेडरहिल, यूएसए येथे वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 110 धावांची खेळी केली, केवळ 20 आंतरराष्ट्रीय डावांत खेळाच्या तिन्ही प्रकारात त्याने शतके झळकावली.

माजी कर्णधार रविचंद्रन अश्विनने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये प्रवेश केल्यानंतर राहुलला पंजाब संघाचा कर्णधार बनवण्यात आले.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 69 चेंडूत 132 धावा करून आयपीएलच्या या मोसमात भारतीय फलंदाजाच्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नावावर आहे.  या मोसमात 14 सामन्यांत त्याने 55.83 च्या सरासरीने पाच अर्धशतके आणि एका शतकासह 670 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकला.

तो म्हणतो, 'आपलं करिअर फार दीर्घ स्वरूपाचे नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.  मला 2019 नंतर समजले की माझ्याकडे कदाचित 12 किंवा 11 वर्षे शिल्लक आहेत आणि मला संघासाठी खेळण्यासाठी  माझा सर्व वेळ आणि शक्ती पणाला लावावी लागणार आहे.  मानसिकतेतील या बदलामुळे मला खूप मदत झाली. जेव्हा मी संघासाठी चांगले काम करण्याबरोबरच चॅम्पियन संघाचा एक भाग बनून खेळात बदल करण्यावर लक्ष केंद्रित केले तेव्हा माझ्यावरील दबाव कमी झाला.'-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली