Saturday 4 September 2021

संत सेना महाराज

 


आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक।। विवेक दर्पण आयना दाऊ। वैराग्य चिमटा हालऊ।। उदक शांती डोई घोळू। अहंकाराची शेंडी पिळू।। भावार्थाच्या बगला झाडू। काम क्रोध नखे काढू।। चौवर्णा देऊनी हात। सेना राहिला निवांत।।

संतश्रेष्ठ सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना संत ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या संत सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान होता. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना त्यांचे मन मात्र देवपूजेत रमलेले असे. एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावणे धाडले. तेव्हा संत सेना महाराज पूजेत रममाण आहेत, हे ऐकून बादशाहा चिडला. त्याने महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि त्यांना वाचविले. देव व भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते- विटेवरी उभा। जैसा लावण्याचा गाभा॥ पायी ठेउनिया माथा। अवघी वारली चिंता॥ समाधान चित्ता। डोळा श्रीमुख पाहता॥ बहु जन्मी केला लाग। सेना देखे पांडुरंग॥

संत नामदेव, संत नरहरी सोनार, संत परिसा भागवत, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्याप्रमाणे संत सेना महाराजांचे कोठेही स्वतंत्र व सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. जन्म किंवा निर्वाणाची तारीखही सापडत नाही. समकालीन संत जनाबाईंसारख्यांनी महाराजांचा उल्लेख एक विठ्ठलाचे निस्सीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून केला आहे. संतश्रेष्ठ सेना महाराज हे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात उतर भारतामध्ये गेले होते. स्वामी रामानंदांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी पुढे हिंदी रचना केली असावी. संत नामदेवांप्रमाणेच त्यांनी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतांमधील भाषांमध्ये साहित्य लिहिले आहे. म्हणून शिख बांधवांचे धर्मग्रंथ पवित्र गुरुग्रंथसाहिब यांत त्यांच्या एका पदाचा समावेशही केलेला आढळतो. त्यांच्या अनेक उत्तरकालीन संतांनी आणि हिंदी-मराठी संशोधकांनी त्यांच्या काव्याचा अभ्यास मांडलेला आहे- जेथे वेदा न कळे पार! पुराणासी अगोचर!! तो हा पंढरीराणा! बहु आवडतो मना!! सहा शास्त्र शिणली, मने मौनची राहिली!! सेना म्हणे मायबाप! उभा कटी ठेउनी हात!!

एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपणा जाणवत नाही. संत ज्ञानेश्‍वर व संत तुकारामांइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. त्यांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या र्मयादा नसतात हेच यावरुन सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घडले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात. अशी त्याची जीवन यात्रा अखेरपर्यंत चालू राहिली. बर्‍याच दिवसानंतर ते जन्मभूमीकडे सर्वांचा निरोप घेऊन जायला निघाले. जिथे जन्मले त्या मातीची ओढ लागली होती. त्याच्या पुनरागमनानंतर बांधवगडला पुनर्वैभव प्राप्त झाले. राजा बिरसिंहांनी त्यांचे राजेशाही थाटात स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाचे रूप डोळ्यांत साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चिंतनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अडकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुडीतील आत्मतत्त्व अनंतात विलीन झाले.

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।। या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी। पाहिली शोधोनी अवघी तीर्थे।। सेना म्हणे खूण सांगितली संती। यापरती विश्रांती न मिळे जीवा।। असे म्हणत हे वारकरी संतशिरोमणी विठ्ठलचरणी लीन झाले. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा होता. हा दिवस संतश्रेष्ठ सेना महाराजांची पुण्यतिथी दिवस म्हणून पाळला जाते.


No comments:

Post a Comment