Wednesday 2 June 2021

भारतातील जैवविविधता


निसर्गातील सजीव सृष्टीत असणारे वैविध्य म्हणजे जैवविविधता. जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर प्रचंड जैवविविधता आहे, मात्र यातील फक्त २० टक्केच जैवविविधता आजअखेर शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासलेली आहे. ८० टक्के जैवविविधता अद्याप मानवास अपरिचित आहे. आतापर्यंतच्या सजीवांच्या १८ लाख प्रजाती अभ्यासल्या गेल्या. त्यांपैकी ११ लाख प्राण्यांच्या, चार लाख वनस्पतींच्या, तर उर्वरित प्रजाती सूक्ष्म जिवांच्या आहेत. जागतिक स्तरावर भारत हा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविधतेत सहावा, पक्ष्यांच्या विविधतेत सातवा, उभयचर व सस्तन प्राण्यांच्या संख्येत आठवा असून, सपुष्प वनस्पतींच्या विविधतेत बाराव्या स्थानावर आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.भारतात हवामान व भौगोलिक रचनेत मोठी विविधता आहे, येथे प्राण्यांच्या ८१ हजार, तर वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती नोंदविल्या आहेत. सस्तन प्राण्यांच्या ३७२ प्रजाती, पक्ष्यांच्या १२२८, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ४२८, उभयचर प्राण्यांच्या २१०, तर माशांच्या २५४६ प्रजाती आढळतात. किटकांच्या ५० हजार, तर इतर अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या सुमारे २६ हजार प्रजाती आहेत. भारतात सर्वात जास्त जैवविविधता हिमालय भूप्रदेश व पश्चिम घाट परिसरातील वनक्षेत्रात आढळते. 

भारतात अस्तित्वात असणाऱ्या एकूण प्रजातींपैकी ६३ टक्के प्रजाती हिमालयात आढळतात. दख्खनचे पठार व पश्चिम किनारपट्टीत पसरलेली पर्वतरांग म्हणजे पश्चिम घाट. एकूण सहा राज्यांत पश्चिम घाट पसरलेला असून, यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. जंगलवनांत व सभोवताली असणारी जैवविविधता मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मानली जाते. 

जैवविविधता व वन्यजिवांच्या संरक्षण-संवर्धनासाठी शासनाकडून अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने तसेच संरक्षित राखीव वनांची निर्मिती केली आहे. वाघ, सिंह, हत्ती, बिबटे, पक्षी यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी संरक्षित केंद्रे तयार केली आहेत; पण दुसऱ्या बाजूस शेती व रस्ते विकास, शहरीकरण व औद्योगिकीकरणासारखे विकास प्रकल्प अनियंत्रितपणे राबविले जात असल्याने वनांच्या ऱ्हासाचा वेग प्रचंड वाढलाय.  वाघ, सिंह, हत्ती हे वन्यप्राणी अतिसंकटग्रस्त बनले आहेत. भारतात दरवर्षी ३० हत्ती व ५० वाघांची चोरटी शिकार होते. २०१८ मध्ये भारतात १०२ वाघ, ५७ हत्ती व ४७३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज भारतात सपुष्प वनस्पतींच्या १५०० प्रजाती व १२० वनौषधी संकटग्रस्त म्हणून जाहीर केल्या आहेत. चिता नामशेष झाला आहे.भारतातील सस्तन प्राण्यांच्या ९० प्रजाती, पक्ष्यांंच्या ७५, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २५, उभयचरांच्या २५ व माशांच्या ३९ प्रजाती संकटग्रस्त असून, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. देशी वाणंही नष्ट होत आहेत. जंगलवनांवरील मानवी हस्तक्षेप असाच सुरू राहिल्यास पुढील ३० वर्षांत भारतातील ४८ ते ५० टक्के जैवविविधता नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.वाढते प्रदूषण व वनांचा विनाश यामुळे जागतिक तापमानवाढ व बदलते हवामान यांचे गंभीर संकट उभे आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ विचारसरणी स्वीकारली पाहिजे.

No comments:

Post a Comment