Friday 30 April 2021

फटाक्यांचा शोध


फटाके म्हटले की आपल्याला आठवते ती दिवाळी. म्हणजे आपल्याकडे दिवाळी आणि फटाके यांचे एक समीकरणच बनले आहे. त्याच बरोबर देशात आणि जगभरात नववर्षाच्या स्वागतासारख्या अनेक प्रसंगी फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी केली जात असते. आकाशात विविध रंगांमध्ये झळाळणारी ही  आतषबाजी डोळ्यांचे पारणे फेडत असते. मात्र या फटाक्यांचा शोध चीनमध्ये लागला. तोही एका विचित्र अपघाताने. इसवी सनाच्या पूर्वी म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीच  फटाक्यांच्या विकासाला सुरुवात झाली होती. चीनमध्ये इसवी सन पूर्व २०० या काळात  फटाक्यांचा शोध लागला असे मानले जाते. एका  रात्री शेकोटी करीत असताना लाकडे संपली म्हणून कुणीतरी आगीत बांबूचा तुकडा फेकला. बांबू काळा पडत गेला व त्यामधून निखारे बाहेर पडू लागले आणि अचानक मोठा आवाज होऊन बांबूचे तुकडे झाले. असा आवाज यापूर्वी कुणी ऐकला नव्हता. सगळेच या आवाजाला घाबरले. लोकांचा असा समज झाला की जर या आवाजाने माणूस घाबरू शकतो तर दुष्ट आत्मेही घाबरू शकतात. तत्कालीन चीनमधील लोकांचा असा समज होता की निआन नावाचा दुष्ट आत्मा त्यांच्या शेतातील पीक खराब करतो. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या दिवशी या निआनला घाबरवण्यासाठी बांबू आगीत टाकून तो फोडण्याची परंपराच तिथे सुरू झाली. त्यानंतर मग लग्न समारंभ, राज्याभिषेक, जन्मसोहळा आदी महत्त्वाच्या प्रसंगीही बांबू फोडले जाऊ लागले. त्याला 'पाओ चूक' असे म्हटले जात असे. ही परंपरा पुढील शेकडो वर्षे सुरू होती. बांबू शिवायही अशा प्रकारचा आवाज काढणारा पदार्थ शोधणारे काही चिनी लोक होते. इसवी सन 600 ते 900 या दरम्यान स्फोटक अशा गन पावडरचा शोध लागला. गंधक, पोटॅशियम नायट्रेट, मध, आर्सेनिक डायसल्फाईड आदींचे मिश्रण स्फोटक असल्याचे लोकांना समजले. या मिश्रणाला 'हुओ याओ' म्हणजेच 'स्फोटक पदार्थ' असे म्हटले गेले. हे मिश्रण बांबूमध्ये भरून आगीत टाकले की जोरदार आवाज येतो हे दिसून आले आणि यामधूनच फटाक्यांचा शोध लागला! मग यात कमालीचं संशोधन सुरू झालं आणि केवळ आवाजापर्यंत मर्यादित न राहता हे मिश्रण रोषणाई आणि उंच आकाशात कसं उडवता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. हे तंत्र शोधत असताना याचा वापर युध्दातही होऊ लागला. दरम्यान, हे तंत्र काही पर्यटकांनी युरोपात आणलं आणि फटाक्यांच्या विकासाने वेग धरला. मग आकाशात उडणाऱ्या या फटाक्यांमध्ये रंग आणण्यासाठी विविध धातूंचे अंश मिसळण्यास सुरूवात झाली. आज उपलब्ध असलेला पाऊस, भुईचक्र, रोषणाई अशा फटाक्यांचा आनंद हजारो वर्षं मानव घेत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment