Sunday 7 March 2021

संत अक्कमहादेवी


कर्नाटकचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा शिमोगा जिल्ह्य़ातील शिराळकोण तालुक्यातील 'उडितडी' येथे चैत्र शुद्ध पौर्णिमा ११४६ रोजी निर्मलशेट्टी व सुमती या दांपत्याने पोटी अक्का महादेवीचा जन्म झाला. आईवडील दोघेही शिवभक्त गिरिजा मातेचे फळ म्हणून तिचे नाव महादेवी ठेवले. शिवभक्ताच्या घरी जन्मलेल्या महादेवीला वयाच्या अठव्या वर्षी शिवाचार्याकडून शिवदीक्षा देण्यात आली. भारतातल्या श्रीशैल-मल्लिकार्जुन हे त्यांच्या घराण्याचे कुलदैवत होय. त्यामुळे अक्कामहादेवीवर बालपणापासून श्रीशैल मल्लिाकार्जुन आराध्य दैवताचा विलक्षण प्रभाव पडला होता.

एका राजाने (पुरुषाने) दिलेले वचन न पाळल्याने अक्का त्याचा सर्मथपणे त्याग करते. स्त्री म्हणून त्याच्या अत्याचाराला बळी न पडता प्रतिकार करून धिक्कार करते. आजच्या काळातही स्त्रिया अत्याचाराला बळी पडतात. तेव्हा १२ व्या श्तकातील अक्काचे कडकडीत वैराग्य तिचे दिगंबरत्व अलौकीक ठरते. एका शिवशरणीच्या स्पर्शाने झालेला एका पुरुषाचा उद्धार म्हणजे एका महिलेकडून झालेला पुरुषोद्धारच होय.

अशा दिगंबर अवस्थेत अक्कामहादेवी मार्गक्रमण करीत कल्याणच्या अनुभवमंटपामध्ये प्रवेश करते. तेव्हा अनुभव मंडपाचे अध्यक्ष अल्लमप्रभू तिची कठोर परीक्षा घेतात. या कठोर परीक्षेतून महादेवीचे प्रखर ज्ञान दिसून येते. अल्लमप्रभू तिला प्रश्न करतात, तू कामाला जिंकले असे म्हणते मग केसांनी शरीर झाकण्याचे कारण काय तेव्हा ती आपल्या वचनातून उत्तर देते. फक्त अत पल्लव झाल्याशिवाय बाह्य़ साल निघत नाही. काममुद्रा पाहून तुम्ही कामपीडित होऊ नये या भावनेने मी अंग झाकले. तिच्यातील काम, क्रोध, मोह, मत्सर हे विकार केव्हाच गळून पडले होते. अल्लमप्रभूच्या प्रश्नांना सर्मपक उत्तर दिल्यामुळ सारा अनुभव मंडप अक्कामहादेवीचा जयजयकार करतो. अनुभवमंडपातील दिग्गजांनाही अशा तर्‍हेने ती निरूत्तर करते याचे प्रमुख कारण प्रखर वैराग्य, आत्मविश्‍वास, दृढनिश्‍चय होय.

अक्कामहादेवी या महान शिवयोगीनी होत्या. अष्टपैलू व्यक्तिमत्वाबरोबरच प्रतिभावंत, लावण्य, निर्भिडता, गोड गळा व प्रचंड आत्मविश्‍वास त्यांना लाभला होता. संतत्व आणि देवत्व प्राप्त होण्यासाठी ज्या विशेषत्वाची गरज भासते ते सर्व गुण अक्कामहादेवीमध्ये एकवटलेले होते म्हणून त्या आज समस्त स्त्रीजातीला वंदनीय आहेत. या भारतभूमीवर जणू ईश्‍वर प्राप्तीच्या सुखासाठीच तिचा जन्म झाला होता. तिला फक्त एकच ध्यास होता चन्नमल्लीकार्जुनाची प्राप्ती. यातून तिचे वेगळेपण व श्रेष्ठत्व स्पष्ट होते.

प्रतिभावंत संतकवयित्री

अक्कामहादेवी ही भारतीय साहित्यातील पहिली श्रेष्ठ कवयित्री होय. महाराष्ट्रातील जनाबाई, बहिणाबाई यांच्याही दोनशे वर्ष आधी महादेवी वचनांच्या माध्यमातून साहित्यरचना केलेली आढळते. त्याचा प्रभाव मराठी संतांवरही पडलेला दिसतो. महादेवीची वचने ही अनुभवातून फुललेली आहे. त्यांच्या वचनात अध्यात्मिक आणि काव्य, तत्व अणि ललित्य यांचा सुंदर संगम झालेला अढळतो. महादेवीबद्दल सांगताना म्हणतात 'माझ्या भक्तीची शक्ती तूच, माझ्या मुक्तीची शक्ती तूच' ज्या सत्पुरुषांनी जिला आपली शक्ती मानले ती वंदनीय असणारच.

अक्कामहादेवीच्या वचनांचे विषय आणि वैशिष्ट्ये

सत्यवचनी, ज्ञानयोगिनी, मार्गदर्शिनी, विरागिनी, शिवयोगिनी बरदायीनी अशा अनेक विशेषणातून अक्कामहादेवीचा गौरव करण्यात येतो. अक्कामहादेवीची ४३४ वचने आज उपलब्ध असून या वचनांमध्ये अनेक विषय आढळून येतात. अंतरिक मनाचे विश्लेषण मानवी मुल्यांची महती व प्रतिष्ठापना, सकल प्राणीजनांचे कल्याण, सद्भाव, सद्भक्ती, भक्तियोग, शिवयोग, सद्गुणश्रेष्ठतेचा गौरव, समता, मानवता, शालीनता, बंधुता, स्त्रीगौरव, जातीभेदाविषयी तिरस्कार समाजविकृतीचे खंडन व निर्मुलन अंधर्शद्धांवर अघात, विश्‍वकल्याण याशिवाय अध्यत्मिक तसेच सामाजिक विषयाचे उद्बोधन यांनी आपल्या वचनांतून केले आहे. अक्कामहादेवीची वचने ही सर्व जीवनस्पश्री, जीवनव्यापी व जीवनप्रभावी अशी आहेत. संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्या वचनसाहित्यात सामावली आहे.

शरणसत्ती लिंगपती या तत्वसिद्धांताचा अक्कामहादेवी यांच्या मनावर एवढा प्रभाव पडला होता की त्या प्रत्यक्ष शिवालयाच आपला पती, सर्वस्व मानू लागल्या. याच भावनेने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आणि उच्च उदात्त व श्रेष्ठ साहित्यीक दर्जाच्या वचनांतून जगाला जीवनतारक संदेश दिला. त्यामुळे कर्नाटकमध्ये त्यांना सर्वत्र जगन्माता, महाशिवयोगीनी अक्का म्हणजे थोरली बहीण असे गौरवाने संबोधण्यात आले.

अक्कामहादेवीच्या वचनात सहजता, सुंदरता, सरलता, भावोत्कटता, भावसौंदर्यता, जीवनसत्यता, सारगर्भित्ता, अनुभवसीलता, वास्तवता, भक्तिप्रधानता, अध्यात्मप्रधानता ही महादेवीच्या वचनसाहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये होय. अक्कामहादेवीची वचने म्हणजे आत्म्याचे उद्गार होय त्यांच्या वचनात अध्यात्म आणि काव्य तत्व आणि काव्य लालित्य यांचा सुंदर संगम झाला आहे.

अक्कामहादेवीच्या वचनात स्त्री जातीत सर्वश्रेष्ठ मानलेल्या अनेक स्त्रियांच्या साहित्याची झलक स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या वचनात ग्रीक सोफियाची कल्पकता, कोमलता आढळते. तामीळ प्रांताच्या आंडाळचे आत्मसर्मपण दिसते. अरेबियाच्या राबियाचे चिंतन दिसते. मुस्लिम थेरेसाचे वैराग्य पहावयास मिळते. राजस्थानच्या मीरेची भक्ती आढळून येते. काश्मिरच्या लल्लेश्‍वराची योगसाधना आढळते. महाराष्ट्राच्या मुक्ताबाईचे प्रौढत्व दिसते. तिच्या वचनातून प्रतिध्वनीत होणारा दिव्यसंदेश स्त्री जातीलाच नव्हे तर अखंड मानवजातीला मार्गदर्शक ठरतो. त्यामुळे कर्नाटकात सर्वत्रजगन्माता महाशिवयोगीनी असा अक्कामहादेवीचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात येतो. शरीरालाच देव मानणार्‍या समाजाला आत्म्याच्या अंत:सार्मथ्याची खरी ओळख त्यांची वचने करून देतात. मूळ कन्नड भाषेत असलेली त्यांची वचने मराठी, इंग्रजी, हिंदी तसेच अनेक दक्षिण भारतीय भाषांमध्ये अनुवादित जीवनकार्याचा व वचनसाहित्याचा अवर्जुन समावेश झालेला आढळतो.

'अक्का बळग' (अक्काचा परिवार) या नावाने वीरश्‍वै स्वीयांच्या हजारो संस्था, संघटना कर्नाटकच्या शहरी आणि ग्रामीण भागात आजही आढळून येतात. सामाजिक, सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांमध्ये या संस्था केंद्रस्थानी आहेत.

No comments:

Post a Comment