Sunday 22 March 2020

ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना.पेंडसे


श्री. ना. पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपयर्ंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्‍वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्‍वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत.
खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही पेंडसे असा होण्याऐवजी शिरूभाऊ असाच होत होता, याची प्रचीती श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
मुंबईच्या बेस्ट कंपनीत सेवानवृत्तीपयर्ंत नोकरी करून या संस्थेच्या आत्मीयतेपोटी त्यांनी १९७२ मध्ये बेस्ट उपक्रमाची कथा हे पुस्तकही लिहिले. प्रारंभी आपल्या कादंबर्‍यांतून कोकणातील विश्‍व आणि लोकजीवन चितारणार्‍या श्री.नां. नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबर्‍यांतून व्यक्त केले. फडके, खांडेकर प्रभावित मराठी कादंबरी एका आवर्तात फिरत असताना पेंडसे यांच्या कादंबरीने एक नवी वाट चोखाळली. मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबर्‍यांपासून रूढ झाली.
कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वायप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच श्री.ना.पेंडसे यांची जीवनकला ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. खडकावरील हिरवळ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक. जुम्मन (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही. व्यक्तीचा शोध, व्यक्तिमनाचा समग्र विचार हे त्यांच्या लेखनामागील प्रधान सूत्र होते. त्यांना सुचलेल्या कादंबर्‍या या बहुश: त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाहिलेल्या माणसांवरून सुचलेल्या आहेत. पेंडसेंची पहिली कादंबरी एल्गार १९४९ मध्ये प्रकाशित झाली.
एल्गारने पेंडसेंना जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले, तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या. एल्गार (१९४९) पाठोपाठ हद्दपार (१९५0) आणि गारंबीचा बापू (१९५२) या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसेंनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. गारंबीचा बापू ही तर तत्कालीन वाचकांना झपाटून टाकणारी, चेटूक करणारी कादंबरी ठरली. याच तीन कादंबर्‍या समोर ठेवून गंगाधर गाडगीळांनी हणैर्चा दीपस्तंभ हा लेख लिहून पेंडसेंचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले होते.

No comments:

Post a Comment