Wednesday 28 October 2020

घामाचा पैसा


एका शेठजींचा मुलगा, अजू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका, काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला. शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसऱ्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले, बाहेर पडायला सांगितले. पैसा कमावून आणला तर जेवायला मिळेल ही अट ठेवली. अजूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांना विहीरीत फेकला. दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अजू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अजू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला. हे पाहताक्षणीच अजू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघूम झाला. पण त्या माणसाने अजूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अजू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खऱ्या कष्टाची किंमत कळली.

तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.

●●●●●●●

★एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणे आणि नंतर तिचाच अभिमान वाटणे हे काळ सापेक्ष आहे. लहान असताना पायाचे अंगठे पकडणं हा अपमान असतो. चाळीशी नंतर (हे जमल्यास) याचा अभिमान वाटू लागतो!

●●●●●●●●

★लोक गरजेनुसार आपला वापर करून घेतात आणि आपल्याला वाटते लोक आपल्याला पसंत करतात . हाच तर आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे.

●●●●●●●●●

★चणे जेव्हा गूळासोबत असतात तेव्हा त्याला " प्रसाद " म्हणतात  आणि चणे जेव्हा दारू सोबत असतात  तेव्हा त्याला " चकणा " म्हणतात . शेवटी संगत महत्त्वाची . तुम्हाला वाया घालवणारे नाही तर तुम्हाला घडवणारे मित्र शोधा . झीजून गेलात तरी चालेल पण गंजून जाऊ नका.

●●●●●●●●●

★ मंदिरात जाऊन देवाला प्रसाद चढवण्यापेक्षा मंदिरा बाहेरील गरजूंना तो खाऊ घाला . मंदिरातील प्रसाद देवा पर्यंत पोहोचणार नाही पण त्या गरजूंना दिलेला प्रसाद मात्र देवापर्यंत नक्कीच पोहोचेल .कारण देव देवळात नाही तर मानवतेत आहे . जो मूळ सोडून फांद्यांचा शोध घेतो तो सदैव भटकत राहतो.

●●●●●●●

*वाचा विनोद*

साहेब : काय रे? ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोपतोयस की काय?

बंड्या : नाही सर, लंचला चायनीज खाल्लं ना आज, त्यामुळे डोळे जरा बारीक झाले आहेत...बस्स!

संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment