Thursday 29 October 2020

तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन आरोग्याला लाभदायी


पूर्वीच्या काळी घरोघरी तांब्याच्या घागरी, हंडे, तांब्या, जग अशी भांडी हमखास दिसायची. काळ बदलला तसे तांब्याची भांडी घरातून कमी झाली. वास्तविक तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून ठेवणे, आरोग्याच्या दृष्टीने लाभकारक आहे. आज ज्या कुटुंबांना तांब्याच्या भांड्यांचे महत्त्व माहीत आहे,त्या घरात मात्र आपल्याला तांब्याची भांडी दिसून येतात. आता संपूर्ण तांब्याची भांडी दिसत नाही, तर वरून स्टील आणि आतून तांबे असलेली भांडी बाजारात दिसून येतात.  कारण तांब्याची भांडी महाग आहेत. असे असले तरी काही घरात आपल्याला हमखास तांब्याची भांडी दिसून येतात. तांब्याच्या भांड्याचा उपयोग म्हणजे त्यामध्ये पाणी साठवून ते पिणे. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे शास्त्रीयदृष्ट्या आधार आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवून ते प्यायल्याने पाण्यामधील रोगकारक सूक्ष्मजंतू कमी होतात, असे आढळून आले आहे. या प्रक्रियेला  'ऑलिगोडायनॅमिक इफेक्ट' असे म्हटले जाते. हा धातूंचा  प्रभाव, विशेषतः जड धातू, अगदी कमी तीव्रतेमध्ये देखील होतो. पाणी तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीत साठवले जाते, तेव्हा काही प्रमाणात त्यातील रेणू किंवा 'कॉपर आयर्न' पाण्यामध्ये उतरतात. ते पाण्यामधील जंतूंना बांधले जातात आणि ते सूक्ष्मजंतूंच्या पेशींचे आवरण नष्ट करतात व परिणामी पाण्यातील जंतू नष्ट होतात. एका अभ्यासानुसार, तांब्याचा हा मानवी उपयुक्त प्रभाव पाण्यात असण्याऱ्या ई. कोलाई, व्ही. कॉलरा आणि एस. फ्लेक्सनेरी अशा अनेक जंतूंवर होतो हे सिद्ध झालेले आहे. एका अभ्यासात हे जिवाणू पाण्यामध्ये मिसळून ते १२ तास तांब्याच्या भांड्यात ठेवण्यात आले व १२ तासांनंतर त्याची वाढ होते का, हे तपासण्यात आले. तांब्याच्या भांड्यात ठेवण्यात आलेल्यापाण्यामध्ये जिवाणूंची वाढ दिसली नाही. म्हणजेच, तांब्याच्या भांड्यात साठवल्या गेलेले पाण्यामध्ये जंतू नष्ट होण्यास किंवा त्यांची वाढ रोखण्यात मदत होते.

पाणी किती वेळ साठवावे?

पाण्यातल्या जिवाणूंवर प्रभाव होण्यासाठी १२ ते २४ तास ते पाणी तांब्याच्या भांड्यात साठवावे, असे अभ्यासात आढळले. पाणी ६ तासांपेक्षा कमी ठेवल्यास त्याचा ऑलिगोडायनॅमिक परिणाम खूप कमी होतो व त्याचा जास्त उपयोग होत नाही. कॉपर शरीराला जास्त प्रमाणातही चांगले नाही. तांब्याच्या भांड्यात साठलेल्या पाण्यात तांब्याचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या परवानगी मर्यादेत असावे. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यास त्याचा पीएच वाढतो; म्हणजेच ते पाणी थोडे अल्कलीधर्मीय किंवा कमी आम्लधर्मीय होते. शुद्ध पाण्याचा सरासरी पीएच ७ असतो, जो आम्ल आणि अल्कलीचा मध्य मानला जातो. अल्कली पाणी पिण्याने शरीराला अनेक फायदे होतात, असे मानले जाते.

चांदीच्या भांड्यात काय होते?

तांब्याबरोबर चांदीच्या भांड्यात पाणी साठून त्याचा जिवाणूंवर होणाऱ्या परिणामाचाही अभ्यास केला गेला. प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये जिवाणू असलेले पाणी तांब्याच्या व चांदीच्या भांड्यात ठेवून ते ६, १२ व २४ तासांनी तपासण्यात आले. प्रत्येक वेळी किती टक्के जिवाणू तुलनेत किती कमी होतात, हे तपासले गेले. त्यानुसार चांदीचे भांडेतांब्याच्या भांड्याच्या तुलनेत पाण्यातील जिवाणू सरासरी १० टक्के कमी नष्ट करते, असे आढळून आले.



No comments:

Post a Comment