Sunday 18 October 2020

अशफाक उल्ला खान

अशफाक उल्ला खान (२२ ऑक्टोबर १९00, मृत्यू : १९२७) भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख क्रांतिकारक. त्यांनी काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये त्यांचा भाग होता. इंग्रज सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि १९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावण्यात आले. राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते. त्यांचे उर्दूमध्ये तखल्लुस, (टोपण नाव) हसरत हे होते. उर्दू व्यतिरिक्त ते हिंदीत व इंग्रजीतसुद्धा कविता लिहीत असत. त्यांचे पूर्ण नाव अशफाक उल्ला खान वारसी हसरत असे होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात बिस्मिल आणि अशफाक यांची भूमिका निर्विवादपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक अनुपम उदाहरण आहे. अशफाक उल्ला खान यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील शहीदगढ शाहजहानपूरमध्ये रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कदनखैल जलालनगर मोहल्ल्यात २२ ऑक्टोबर १९00 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद शफीक उल्ला खान, तर मजहूरुन्निशाँ बेगम आईचे नाव होते. अशफाक यांनी स्वत: आपल्या डायरीमध्ये लिहिले आहे की, 'जेथे एकीकडे त्यांच्या वडिलांच्या खानदाणीत एकही जण पदवीधर होईपर्यंतचे शिक्षण प्राप्त करू शकला नाही आणि दुसरीकडे त्यांच्या आजोळी सर्व उच्चशिक्षित होते. त्यातील काही तर डेप्युटी कलेक्टर व एस. जे. एम. (सब ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट) पदावरही काम करत होते. १८५७ च्या गदरयुद्धात त्या लोकांनी (त्यांच्या आजोळच्यांनी) जेव्हा भारताची साथ नाही दिली, तेव्हा इतर जनतेने रागाच्या भरात त्यांचा आलिशान बंगला आगीत भस्म करून टाकला. तो बंगला त्या शहरात आजही जली कोठी (जळालेला बंगला) या नावाने प्रसिद्ध आहे. अशफाक यांनी आपले बलिदान देऊन त्यांच्या आजोळच्यांच्या नावावरील कुरूप डाग कायमचा धुवून टाकला.

अशफाक आपल्या भावंडांत सर्वात लहान होते. सर्व प्रेमाने त्यांना 'अच्छू' म्हणत असत. एके दिवशी त्यांचे मोठे भाऊ रियासत उल्ला यांनी अशफाक यांना बिस्मिल यांच्या बद्दल सांगितले की, ''ते एक सर्मथ व्यक्ती आणि उत्तम दर्जाचे कवीही आहेत. मात्र हल्ली मैनपुरी कांडामध्ये अटक झाल्या कारणाने शहाजहानपूरमध्ये दिसत नाहीत. देव जाणे कुठे आणि कोणत्या स्थितीत रहात असतील. बिस्मिल त्यांचा सर्वात उमदा क्लासफेलो आहे.'' अशफाक तेव्हापासूनच बिस्मिल यांच्या भेटीसाठी उतावळे झाले. काळ पुढे लोटला. १९२0मध्ये सार्वत्रिक माफीनंतर राम प्रसाद बिस्मिल आपल्या गावी शाहजहानपूरला आले आणि घराच्या कारभारात मग्न झाले. अशफाक यांनी कित्येकदा बिस्मिल यांची भेट घेऊन त्यांचा विश्‍वास मिळविण्याचा प्रयत्न केला, पण ते असफल राहिले. एके दिवशी रात्री खन्नौत नदीच्या किनारी एका सुनसान जागेवर बैठक चालू होती तिथे अशफाक पोहोचले. बिस्मिल यांच्या एका चारोळी (शेर) वर जेव्हा अशफाक यांनी 'आमीन' म्हटले तेव्हा बिस्मिल यांनी त्यांना जवळ बोलावून त्यांचा परिचय करून घेतला. बिस्मिल यांना समजले की, अशफाक हे त्यांचे क्लासफेलो रियासत उल्ला यांचे सख्खे लहान भाऊ आहेत, तसेच उर्दू भाषेचे शायर (कवी) आहेत, आणि बिस्मिल यांनी त्यांना आर्य समाज मंदिरात येऊन वैयक्तिक भेटीसाठी बोलाविले. घरच्यांचा विरोध असून देखील अशफाक आर्य समाजात पोहोचले आणि राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी खूप वेळच्या चर्चेनंतर त्यांच्या पार्टीचे(मातृवेदीचे)सक्रिय सदस्य झाले. येथूनच त्यांच्या जीवनाची नवी कहाणी सुरू झाली. ते कवी तर होतेच, त्या बरोबरच ते देशभक्तही बनले.

No comments:

Post a Comment