Tuesday 12 May 2020

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि मृत माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II / ऑपरेशन शक्ती पुढाकारचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. पूर्वी पोखरन-I हे 1974 साली 'स्माईलींग बुद्ध' क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उडवण्यात आले होते.
या चाचण्यांमुळे भारत राष्ट्रांच्या 'न्यूक्लियर क्लब' मध्ये सामील होणारा सहावा देश ठरला आणि नॉन-प्रोलीफरेशन ऑफ न्यूक्लियर वेपन (NPT) तहामध्ये भागीदार नसलेला प्रथम देश बनला.
याशिवाय, याच काळात देशातच विकसित पहिले स्वदेशी विमान ‘हंस-3’ ने त्याचे पहिले उड्डाण बेंगळुरू येथे घेतले. हे विमान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या विमान नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) ने विकसित केले होते.
तसेच 11 मे 1998 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) कडून ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली, जे नंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद-प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे (SAM) क्षेपणास्त्र ‘त्रिशूल’ हा भारतातील एकात्मिक गाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता.
देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून घोषित केला. भारतात 1999 सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment