Sunday 10 May 2020

जगदीश खेबुडकर

लावणीपासून बालगीत आणि गण-गवळणींपासून देशभक्ती, भक्तिगीतांपयर्ंत गीतलेखनाचे सर्वांत जास्त प्रकार वापरून गेली पाच दशके मराठी गीतरसिकांना मोहित करणारे असामान्य प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर तथा मराठी चित्रसृष्टीचे नाना यांचा जन्म हळदी, ता. करवीर येथे सामान्य कुटुंबात झाला. त्यांचा जन्म १0 मे १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील इंग्रजी राजवटीत १५ रुपये वेतनावर प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळे मराठीचे बाळकडू घरीच मिळाले. बालपण छोट्याशा ग्रामीण भागात गेल्याने बारा बलुतेदारांची लोकप्रिय गीते ऐकल्याने ते काव्यबीज पुढे खेबुडकर यांनी आपल्या एकापेक्षा एक गीतांतून अजरामर केले.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी १९४८ साली मध्ये गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता मानवते तु विधवा झालीस सुचली. काशीला र्शावण बाळ निघाला, आज मरूनीया जीव झाला मोकळा, जग ही पैशाची किमया, नको नको बनू आंधळा, आमुचा जीवन प्याला, जागा हो माणसा, दिला मृगानं हुंदका अशा असंख्य कविता त्यांनी रचल्या. त्यांच्या कवितांना इतका बहर होता की, ते दिवसाला १0 ते ११ कविता लिहू लागले होते. १९५६ मध्ये आकाशवाणीवर खेबुडकर यांचे पहिलेच गीत ऐकून नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी चित्रपटातील पहिले गीत लिहिण्याची संधी दिली. सांगली येथे सन १९६0 साली रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी लावणी लिहिण्याची संधी दिली. आयुष्यातील पहिली लावणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारून अस्सल कोल्हापुरी नजराणाच खेबुडकर यांच्या लेखणीतून प्रकट झाला. मला हो म्हणत्यात लवंगी मिरची या पहिल्याच लावणीच्या ठसक्याने मराठी गीतरसिकांना वेड लावले.
सामना, पिंजरा, साधी माणसं अशा सुमारे साडेतीनशे चित्रपटांसाठी जगदीश खेबुडकर यांनी तब्बल अडीच हजारांवर गाणी लिहिली. यांत तुम्हावर केली र्मजी मी बहाल, कुठं कुठं जायाचं हनीमूनला अशा एकाहून एक सरस लावण्यांबरोबर अष्टविनायका तुझा महिमा कसा, मला हे दत्तगुरू दिसले यांसारखी भक्तिगीते, तर राजा ललकारी अशी दे, ही कशानं धुंदी आली, धुंदी कळ्यांना, ऐरणीच्या देवा तुला, बाई बाई मनमोराचा, आकाशी झेप घेरे पाखरा अशा सर्वांगसुंदर गाण्यांचा समावेश आहे. अष्टविनायक चित्रपटातील अष्टविनायका तुझा महिमा कसा ह्या त्यांच्या गाण्यामुळे सगळ्यांना ५ ते ७ मिनिटात त्यांनी अष्टविनायकाचे दर्शन घडवले. आजवर कोणत्याही मराठी गीतकाराने खेबुडकर यांच्याइतके काव्यप्रकार वापरले नाहीत. गण-गवळण, लावणी, भारुड, गोंधळ, सवाल-जवाब, बालगीत, प्रेमगीत, स्फूर्तिगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, मुक्तछंद, अभंग अशा मराठीत यच्चयावत काव्यप्रकारांत खेबुडकरांनी आपल्या शब्दसार्मथ्याने असामान्य गीते लिहिली. व्ही. शांताराम, पेंढारकर, दादा कोंडके, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके अशा दिग्गजांबरोबर जगदीश खेबुडकर यांनी जसे काम केले तसेच डॉ. अशोक पत्की, पानिपतकार विश्‍वास पाटील, गायक रवींद्र साठे, संगीतकार अजय-अतुल यांनाही अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन केले. कमल हसन यांच्या हे राम चित्रपटासाठी खेबुडकर यांनी गीतेही लिहिली होती. शब्दरुप आले मुक्याला भावनांना, तुम्हावर केली मी र्मजी बहाल, मला हे दत्तगुरू दिसले, कुण्या गावाचं आलं पाखरू, बुगडी माझी सांडली गं, विठ्ठल नामाची शाळा भरली, मोरया मोरया अशा ३५0 मराठी चित्रपटांसाठी तब्बल २७५0 लोकप्रिय गीते लिहिणार्‍या मा.जगदीश खेबूडकर यांनी अगदी बालगीत ते प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, देशभक्तिपर गीते, गणगौळण, गौरीगीते, वासुदेव गीत, माकडवाला, कोळीगीते, सवाल-जवाब, एकतारी भजन, डोंबार्‍याचे गीत, कुडबुडा जोशी गीत, वारकरी भजनापयर्ंत असा एकही गीताचा प्रकार शिल्लक न ठेवता विपुल अशी रसिकमान्य गाणी त्यांनी लिहिली होती. पंचवीस वर्षापूर्वी स्वत:ची नाट्यसंस्था निर्माण करून गावरान मेवा, जिवाची मुंबई, रंगा डायव्हर, राम दर्शन या कलाकृतींचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केली होती. मा.जगदीश खेबूडकर यांना राज्य शासनाचे अकरा, रसरंग फाळके, चित्रपट महामंडळाचे दोन, गदिमा जीवनगौरव असे अनेक पुरस्कार मिळाले.

No comments:

Post a Comment