Sunday 10 May 2020

सातारचे कंदी पेढे

सातारच्या कंदी पेढ्याला इतिहास आहे.ही गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. सातार्‍यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे. सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीच प्रमाण कमी होतं.
लोकांच उपजीविकेच साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीच वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं होतं. हे दुध जवळच मोठ शहर म्हणून सातारला पाठवून दिल जायचं.
काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिर्शण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकार्‍यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.
त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरुवात केली. पुढे याच कँडीच आपल्या सातारकरांनी कंदी केलं.
साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणार्‍या कुटुंबाना सातार्‍यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखल जाऊ लागल. कंदी पेढय़ाला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.
त्यांनी सत्तरवर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढय़ांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपर्‍यात पोहचला. आजही एवढय़ा वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढय़ाचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढय़ाची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो. म्हणूनच गेली १00 वर्ष सातारच्या कंदी पेढय़ांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.
भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढय़ाची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूरराम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखल जात.
महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही.
मात्र इतर पेढय़ांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढय़ाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.
सातारच्या कंदी पेढय़ाची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणार्‍या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथल्या पेढय़ांमधेय सातारच्या माणसांचा स्वॅग मिक्स झालाय. या सगळ्या मुळे सातारच्या पेढय़ाचा ब्रँड जगात फेमस झालाय.

No comments:

Post a Comment