Sunday 31 May 2020

प्रसिध्द लेखक गो.नी. दांडेकर

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (ज्यांना गोनीदा असेही म्हणतात)त्यांचा जन्म ८ जुलै, १९१६ रोजी झाला. हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढय़ात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली.
त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबर्‍या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. १ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव (डॉ.वीणा विजय देव) ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.
गो.नी. दांडेकरांच्या कादंबर्‍यांच्या वाचनाचा सार्वजनिक कार्यक्रम वर्षातून अनेकदा होतो. या उपक्रमाची सुरुवात १९७५मध्ये प्रत्यक्ष गोनीदांनी केली. संत ज्ञानेश्‍वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम मोगरा फुलला या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते. यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. मोगरा फुललाच्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या. गोनीदा हयात असताना सुरू झालेला हा उपक्रम त्यांच्या पश्‍चातही या कुटुंबाने अखंडपणे सुरू ठेवला. त्यांच्या या उपक्रमात पुढे देव कुटुंबीयांचे जावई रुचिर कुलकर्णी हेदेखील सहभागी झाले.
गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक गोनीदांची दुर्गचित्रे या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वत: जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण दुर्गदर्शन, दुर्गभ्रमणगाथा ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वत: प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. किल्ले हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. पवनाकाठचा धोंडी, जैत रे जैत, रानभुली, त्या तिथे रुखातळी, वाघरू, आणि माचीवरला बुधा या त्यांच्या कादंबर्‍यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे. त्यांचा मृत्यू जून १, १९९८ रोजी झाला. आईची देणगी (बालसाहित्य) तर आम्ही भगीरथाचे पुत्र, कृष्णवेध, जैत रे जैत, तांबडफुटी पडघवली, पद्मा पवनाकाठचा धोंडी, पूणार्मायची लेकरं, बिंदूची कथा, माचीवरला बुधा, मोगरा फुलला,मृण्मयी, शितू, सिंधुकन्या, वाघरू, रानभुली, त्या तिथे रुखातळी, छंद माझे वेगळे, त्रिपदी, आनंदवनभुवन, कहाणीमागची कहाणी आदी अनेक कांदंबर्‍या व पुस्तके प्रसिध्द आहेत. गो.नी. दांडेकरांच्या माचीवरचा बुधा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक मराठी चित्रपट बनला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजयदत्त यांचे आहे.

No comments:

Post a Comment