Saturday 19 September 2020

जितेंद्र अभिषेकी


जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म  २१ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.   एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होते. गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्‍या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथार्शमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमके तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. 

संस्कृतपासून ते उदरु शेरोशायरी पयर्ंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचे र्मम होते. अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचे संगीत अभिषेकींचे होते. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिले. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारे होते. अभिषेकींनी जसे स्वत: संगीत दिले तसे दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले. 

अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिले. १९९५ सालच्या नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती . नाट्यदर्पण (१९७८), पद्मश्री (१९८८), संगीत नाटक अकादमी (१९८९), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९0) आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा मृत्यू ७ नोव्हेंबर १९९८ रोजी झाला.

No comments:

Post a Comment