Wednesday 16 September 2020

जयवंत दळवी


 प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. काही वर्षे प्रभात व लोकमान्य वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच मी लेखक आहे अशी ऐट घरात ठेवली नाही. ते स्वत: पत्नी-मुलांमध्ये आपल्या साहित्याविषयी बोलत नसत, परंतु कोणी त्याबद्दल बोलले तर निमूट ऐकून घेत. त्यांचा स्वभाव याला कारणीभूत असेल. अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठया साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे.

जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या उभा जन्म उन्हात या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाटय लेखनाला सुरुवात केली. सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खचरून चार-चार, पाच-पाच जिने चढून फु कट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली. मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि दळवी, हे बंद करा! नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. सभ्य गृहस्थ हो! हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळया टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. त्यांच्या बर्‍याच कथा, कादंबर्‍या, नाटकांतून वेडसर- वेडगळ स्तरावरची माणसे दिसतात. त्यावरही खूप पत्रे, प्रतिक्रिया. सतीश दुभाषी या प्रख्यात नटवर्याने एकदा गंभीरपणे सांगितलंही, दळवी, मी सांगतो म्हणून राग मानू नका! पण एके दिवशी तुम्हाला वेड लागेल! तुम्ही सावध राहा! तुम्हाला या वेडया माणसांचे इतके वेड आहे की, ती माणसे एकदा तुम्हाला वेड लावतील. तुम्ही तो नाद सोडा! या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली! मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले. जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे.

No comments:

Post a Comment