Sunday 20 September 2020

कवी वा.रा.कांत


आशयगर्भ आणि भावतरल कविता लिहिणार्‍या कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वत:च्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं. पारतंत्र्यातच प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा रुद्रवीणा हा काव्यसंग्रह त्यावेळेस मराठवाड्यातच नाही तर उभ्या महाराष्ट्रात लक्षवेधक ठरला. रुद्रवीणा या कवितासंग्रहात कांतांच्या कवितेतील राष्ट्रीय ओजस्वीपणा व प्रणयगीतातील सोज्वळ हळुवारपणा अन् भावमधुर शब्दशैली वाचकांचं लक्ष वेधून गेली. त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपयर्ंत कवी कविवर्य कांतांनी मराठी सारस्वताची सेवा केली. मात्र मराठी सारस्वताने त्यांची काहीशी उपेक्षाच केली.

वा. रा. कांत हे मात्र महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसिद्धी परांगमुखच राहिले. साठ संवत्सरांच्या आपल्या काव्यप्रवासात कांतांनी एकूण १४ काव्यसंग्रह लिहिले. त्याशिवाय १0 अनुवाद्ति ग्रंथ, ११ नाट्यकाव्यं, २ नाटकं. कांतांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले. त्यांनी आपल्याच कवितेवर प्रयोग करून दोनुली हा कवितासंग्रह एका वेगळ्याच काव्यबंधात रसिकांसमोर ठेवला. पण या काव्यप्रकाराची काव्यसमीक्षकांनी हवी तशी दखल घेतली नाही. कदाचित या काव्यप्रकारामुळे मराठी साहित्यात काही मूल्यात्मक भर पडली नसेल, पण या कवितासंग्रहाने मराठी काव्यप्रांतात मौलिक अधिष्ठान दिले आहे हे विसरता कामा नये. मराठी काव्यसमीक्षकांनी माझ्या कवितेची योग्य दखल घेतली नाही, अशी खंत कांतांनी अखेरच्या दिवसात बोलून दाखवली होती. वार्धक्याने हताश झालेल्या कांतांची या आजारपणातही काव्यलेखनाची उमेद शाबूत होती. तिथेच आपल्या शब्दांना त्यांनी बजावून सांगितलं होतं मी पंगू झालो म्हणून तुम्ही अपंग होवू नका माझ्या शब्दांनो! ज्या राजकीय, सामाजिक वातावरणात कांत आपला जीवनप्रवास करीत होते त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सतत प्रकर्षाने परावर्तीत होत होते. फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय घटनांचे भान हा कांतांच्या कवितेचा, प्रतिभेचा खास पैलू होता. स्व. जयप्रकाश नारायण यांनी तेव्हा चालविलेल्या चळवळीवर लिहलेली कविता- पांढरे शुभ्र वादळ, महात्मा गांधींवरील राजघाट ही कविता वा चीनमध्ये झालेल्या सामाजिक लढय़ाच्या संदर्भात चीनच्या भिंतीवर तैयानमेन चौकात झालेल्या रक्तरंजनावर लिहिलेली भिंतीला फुटले पंख ही कविता एकंदरीत या सगळ्याच कविता तत्कालीन सामाजिक व्यथांचा उद्घोष करणार्‍या आहेत. व्हिएतनाम व बांगलादेश येथील सामाजिक दुरावस्था व शोषणावरही कांतांनी प्रहार केला आहे. क्रांतिदश्री, प्रकाशपूजन, देहभान जागवून बेभान करणारी कांतांची कविता ही अगदी भावतरल, संवेदनशील व हळुवारही होती. जीवनातील सौंदर्य, सुखदु:ख, प्रीतीचावियोग, मृत्यू आदी जीवनानुभवांना सजीवपणे प्रकट करीत कांतांची कविता वाचकांना खचीतपणे अंत:र्मुख करणारी आहे. अन् ही कविताच कांतांच्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाची प्रमाण होते. शब्द माझा धर्म / शब्द माझे कर्म / शब्द हेच वर्म / ईश्‍वराचे असं म्हणणारे कांत आपल्या अखेरच्या कवितासंग्रहात मावळते शब्दमध्ये लिहितात .

मराठी वायाच्या उत्तुंग क्षितिजावर कांतांनी शब्दांचं नवीन आकाश उभं करण्याबरोबरच मराठी कवितेस समृद्ध केले. वा.रा कांत यांचे ८ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.

No comments:

Post a Comment