Tuesday 2 June 2020

बाबूराव पेंटर


बाबुराव पेंटर यांचा जन्म ३ जून १८९0 मध्ये कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव म्हादबा मेस्त्री होय. चित्रकला व शिल्पकलेचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या वडिलांचा व्यवसाय सुतारकाम, लोहारकाम करणे हा होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच शिल्पकला, चित्रकला या कलांचे ज्ञान मिळत गेले. या कामात आनंदराव पेंटर त्यांच्या आतेभावाचीदेखील त्यांना सोबत मिळाली. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वत:चे असामान्य कौशल्य सिद्ध कले. सुरुवातीला बाबुराव तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.

आनंदराव व बाबुराव पेंटर हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार. आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी स्वत: प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा त्याचबरोबर छपाई यंत्र, डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केली. १ डिसेंबर १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली व स्त्रीपात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला,आणि तो चित्रपट म्हणजे सैरंध्री. पुण्यातील आर्यन थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी १९२0 रोजी दाखविला गेला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली सावकारी पाश हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनासाठी पाठविलेला भारतातला हा पहिला चित्रपट ठरला. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मास्टर विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. तर मूकपटांतून रुबी मायर्स, मास्टर विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही वैशिष्ट्ये बाबुरावांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. त्यांनी १९२0 ते १९२८ या कालावधीत १७ मूकपट निर्माण केले त्यांपैकी वत्सलाहरण, भक्त प्रल्हाद, हे पौराणिक; तर सिंहगड, कल्याण खजिना, सती पद्मिनी, शहाला शह, हे ऐतिहासिक आणि , सावकारी पाश, हा सामाजिक कथानकावरील चित्रपट निर्माण केले.
सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या आर्क लँप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट होय. पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्यचित्रीकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरतो. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले होते. त्यावेळेपासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधलेगेले व या चित्रपटापासूनच करमणूक कर बसविण्यात आला. याच चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी शिलामुद्रण केलेली ३.४८ ७ ६.९६ मीटर (१0 ७ २0 फूट) लांबी-रुदीची भित्तिपत्रके तयार केली होती. ती चांगलीच प्रभावी ठरली. त्या दृष्टीनेही चित्रपटांच्या भित्तिपत्रकांचे जनकत्व बाबूरावांकडेच जाते. वत्सलाहरणाच्या निर्मितीनंतर त्यांनी माकंर्डेयाचे चित्रीकरण सुरू केले; पण ६ नोव्हेंबर १९२२ रोजी चित्रीकरणाच्या वेळी चित्रपट निíमती गृहाला एकाएकी आग लागून त्याची राखरांगोळी झाली; तथापि त्या राखेतूनही पुनश्‍च आपला चित्रपटसंसार बाबूरावांनी उभा केला व चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली. त्याकाळी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही एक अग्रगण्य चित्रपटसंस्था मानली जाई. चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने कालोचित ठरणारी वेशभूषा व वातावरण निर्माण करण्याची बाबूरावांची हातोटी अनन्यसाधारण होती. असे असले, तरी सुध्दा त्यांचा मुख्य भर बाह्य नेपथ्यापेक्षा अभिनयावर अधिक होता. बाबूरावांना चित्रपटांपेक्षा चित्रकलेत अधिक स्वारस्य होते, तसेच त्यांच्या चित्रपटनिर्मितीत व्यावसायिक बाबींचा अभाव होता. परिणामत: त्यांचे सहकार्‍यांशी मतभेद झाले व त्यांपैकी काहीजण कंपनीतून बाहेर पडले. पुढे बाबूरावांनी या चित्रपटानंतर आणखी तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमचीच बंद झाली. बाबूरांवांच्या चित्रकलेवर वॅट्स, रॉझेटी, बर्न्‍स व लॅडशियर अशा पाश्‍चिमात्य चित्रकारांची छाप दिसून येते. त्रिंदाद, आगासकर, नागेशकर, पत्रावळे व हळदणकर या नावाजलेल्या भारतीय चित्रकारांनी हाताळलेली तंत्रे ते अभ्यासत व आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत. शिल्पकलेत मृद्-शिल्पनापासून तर ब्राँझच्या ओतकामापयर्ंतची सर्व कामे ते स्वत:च करीत. नंतर त्यांनी त्यासाठी स्वत:ची ओतशाळाही उभारली होती. १९३0 च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिर्शणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये पहायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलामहर्षी या पदवीने गौरवण्यात आले होते. १६ जानेवारी १९५४ मध्ये बाबूराव पेंटर यांचं कोल्हापूर येथे निधन झाले.३ १८९0 महान चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा जन्म.

No comments:

Post a Comment