Friday 12 June 2020

आपला जिल्हा आणि त्याची वैशिष्ट्ये

आपण पाहतो, आपल्या घरात, आजूबाजूला राहत असलेल्या अनेकांचं कोणतं ना कोणतं टोपननाव असतचं. अनेकांना पाळण्यातील नाव हे तर असतातच. तसेच घरात आवडीने आणि वेगवेगळ्या नावाने बोलण्यासाठी अनेकांना टोपणनावे ठेवली जातात. त्याचपध्दतीने भक्कम ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावालाही इतिहास आहे. त्यानंतर काही शहरांच्या नावात बदल करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेगवेगळी अशी वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची जुनी नावं बऱ्याच जणांना माहित नसतील.
अशावेळी आपण बराच विचार करत असतो की, जिल्ह्याचे नाव का बदलण्यात आले. त्या मागचा इतिहास काय असेल. कशावरुन हे नाव ठेवण्यात आले असेल.असे एक ना अनेक प्रश्‍न आपल्याला भेडसावत असतात. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यातील काही जिल्ह्यांची नाव काळानुसार बदलत गेली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्या त्या शहरांचा नावांचा उल्लेख केला आहे.  महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे आणि वैशिष्ट्ये
अमरावती:-
 महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी ओळख असलेला अमरावती जिल्हा. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. या जिल्ह्याचे मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे करण्यात आले.
औरंगाबाद:-
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे. आजच्या औरंगाबादचे नाव पूर्वी खडकी होते. तसेच अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या मुघल सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले.
बीड:-
महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव पडले आहे.
भंडारा:-
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द असल्यामुळे भाण शब्दावरुन भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर भंडारा असे ठेवण्यात आले.
बुलडाणा:-
बुलडाणा जिल्हा हा अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये वसलेले. हे शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ओळखले जात होते. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे मुक्कामाचे स्थान. त्यानंतर बुलढाणा हे नाव पडले आहे.
चंद्रपूर:-
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणून ओळख होती. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. या जिल्ह्यात कोळसा खाणी आणि चुन्याच्या खाणीही आहेत.
धुळे:-
महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा पूर्वी पश्‍चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तसेच गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरुन साजेशे खान्देश असे याचे नाव करण्यात आले. त्यांनतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला.
गोंदिया:-
महाराष्ट्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग डिंक (गोंद) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव गोंदिया पडले आहे. गोंदिया शहर हे तांदळाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.
हिंगोली:-
महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली, लिंगोली या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.
जळगाव:-
महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खान्देश म्हणूनही ओळखला जातो. पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला जिल्हा आजचा जळगाव जिल्हा बनला आहे.
जालना:-
महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराच्या इच्छेप्रमाणे ज्याला या ठिकाणी खूप फायदा झाला. त्यांचा विणकामाचा (जुलाह) हा व्यवसाय होता. त्यामुळे जुलाह वरुन जालना या नावाने ओळख सुरु झाली.
कोल्हापूर:-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठमधील एक कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसंमत असे नाव कोल्लापूर होते. पूर्वी कोला नावाचा एका असूराचा महालक्ष्मीने वध केला, त्यानंतर कोल्हापूर या नावाने ओळख सुरुवात झाली असे म्हटले जाते.
लातूर:-
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते. त्यानंतर त्या नावात बदल करुन लातूर या नावाने ओळख निर्माण झाली.
मुंबई:-
महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. तसेच हा जिल्हा सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला भारताचे हॉलिवूड असेही म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई हे नाव देण्यात आले आहे.
नागपूर:-
महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहत असल्याने पूर्वी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक शहरांच्या नावापुढे पूर हे लावले जाते. त्यापध्दतीने नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची नागपूर अशी ओळख निर्माण झाली.
नंदुरबार:-
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.
नाशिक:-
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावांनी ओळखला जातो. नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद म्हणजे फुलांचे नगर होते. तसेच सुरवातीचे नाव त्रिकंटक होते. तसेच गोदावरी तीरावरील नऊ टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे नऊ शिखरांचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्ह्यास हे नाव देण्यात आले. तसेच पौराणिक काळात चौदा वर्षे राम लक्ष्मणाचा वनवास नाशिक जवळील जंगलात गेला. त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृतमध्ये नाकाला नासिक म्हणतात, म्हणूनच या शहराचे नाव नाशिक असे पडले आहे.
उस्मानाबाद:-
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची भूमी ही श्रीराम वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मानली जाते. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरुन या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले आहे.
परभणी:-
महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे.
पुणे:-
महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.
रायगड:-
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.
सांगली:-
महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.
सातारा:-
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.
सिंधुदुर्ग:-
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.
सोलापूर:-
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयातील शिवयोगी श्री सिध्देश्‍वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगी हे नाव पूर्वी सोलापूर शहरास होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नाव सोळा म्हणजे सोला आणि पूर असे नाव तयार झाले आहे. म्हणजे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, चादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रिकरणाने सोलापूर हे नाव पडले आहे.
ठाणे:-
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.
वर्धा:-
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.
वाशिम:-
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.
यवतमाळ:-
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले आहे.
अकोला:-
महाराष्ट्रातील अकोला या शहरात पूर्वी अकोलसिंग नावाच्या राजपूर सरदाराचा शहराशी संबंध आला. त्यानेच हे गाव वसवले असल्यामुळे अकोलसिंगाच्या नावावरुन अकोला असे नाव ठेवण्यात आले.

No comments:

Post a Comment