Friday 5 June 2020

भारतात वाघांची संख्या 2976

सर्रासपणे होणारी शिकार आणि इतर कारणांमुळे गेल्या आठ वर्षात देशात जवळपास 750 वाघांचा बळी गेला आहे. यापैकी मध्यप्रदेशात सर्वाधिक 173, त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 125 वाघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत अतुलनीय वाढ झाली आहे. 2226 वरून वाघांची संख्या 2976 इतकी झाली आहे.  देशात 750 पैकी 369 वाघ नैसर्गिक कारणांमुळे दगावले आहेत. 168 वाघ वन्यप्राणी तस्करांचे शिकार ठरले आहेत. तर 70 वाघांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा तपास सुरू आहे. अपघात व अंतर्गत संघर्ष या कारणांमुळे (या अनैसर्गिक) 42 वाघांचा बळी गेला आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे (एनटीसीए) माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती. 2010 ते 2020 या दहा वर्षांत किती वाघ दगावले,याची माहिती विचारण्यात आले होती. मात्र राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणने 2012 सालापासूनची म्हणजे आठ वर्षांची माहिती उपलब्ध करून दिली.
या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशात दगावलेल्या एकूण 173 वाघांपैकी 38 वाघ तस्करांची शिकार ठरले. 94 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला. 19 वाघांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास चालू आहे. 16 वाघांचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक म्हणजे 526 वाघ एकट्या मध्यप्रदेशात आहेत. वाघांच्या मृच्याबाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या आठ वर्षात राज्यात 125 वाघांचा बळी गेला. यापाठोपाठ कर्नाटकात 111, उत्तराखंड मध्ये 88, तामिळनाडू व आसाममध्ये 54, केरळ आणि उत्तरप्रदेशात प्रत्येकी 35, राजस्थानमध्ये 17, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये 11 तसेच छत्तीसगड 10 वाघांचा शिकार व अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये प्रत्येकी 28 वाघांची शिकार करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment