Saturday 13 June 2020

बहुआयामी व्यक्तिमत्त्व:प्र. के.अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व मानलं जातं. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. यांच्या लेखणीने साहित्यातील बहुतांश सर्व प्रकारांना आपलेसे केले होते, तर त्यांच्या वाणीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे केले होते. साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या क्षमतांसह असामान्य उंची गाठली हे विशेषसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला.
या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा विलक्षण दबदबा होता. जनमानसावर त्यांचा प्रचंड पगडा होता. ते फर्डे वक्ते होते. आपल्या वक्तृत्वाने ते र्शोत्यांना भारावून टाकत असत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. काही काळ ते महाराष्ट्र विधानसभेत आमदारही होते. त्यांच्या काळातही विद्वान व साहित्यिकांबरोबर त्यांचे वादही खूप गाजले. आचार्य ही बिरुदावली त्यांना प्राप्त झाली होती. तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांच' रायटर अँन्ड फायटर ऑफ महाराष्ट्र असं यथार्थ वर्णन केलं होतं. आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. पुणे व लंडन इथे त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं. भारतात परतण्यापूर्वी हॅरो येथे त्यांनी अध्यापनही केलं. पुण्यातील कॅम्प एज्यूकेशन सोसायटीच्या शाळेत ते अध्यापक होते. या शाळेचे पुढे ते मुख्याध्यापकही झाले.नवयुग वाचनमालेद्वारे त्यांनी लिहिलेली शालेय क्रमिक पुस्तकं हे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील मोठं योगदान होय. मराठी रंगभूमीच्या इतिहासात आचार्य अत्रे यांना विशेष स्थान आहे. त्यांनी एकूण २२ नाटकं लिहिली. विनोदप्रधान नाटकांची नवी परंपरा त्यांनी घडवली.साष्टांग नमस्कार,मोरुची मावशी, लग्नाची बेडी , भ्रमाचा भोपळा ही त्यांनी लिहिलेली नाटकं सदाबहार ठरली आहेत. निखळ विनोद हे या नाटकांचं वैशिष्टय. तो मी नव्हेच हे त्यांचं उत्कंठाप्रधान नाटकही प्रचंड गाजलं.उद्याचा संसार सारखी शोकात्म नाटकांही लिहिली. अत्रे यांची चित्रपट कारकीर्दही मोठी आहे. मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्रम्हचारी ब्रॅन्डीची बाटली या चित्रपटांच्या कथा पटकथा त्यांनी लिहिल्या. पायाची दासी, ैधर्मवीर हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट.अत्रे पिस ही संस्था त्यांनी स्थापन केली. होती. साने गुरुजीच्या कथेवर आधारित श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केलं. या चित्रपटाला राष्ट्रपतींच सुवर्णपदक लाभलं. याशिवाय महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. अत्र्यांच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये विनोद आणि सामाजिक आशय यांचं चपखल मिर्शण आढळून येतं. त्यांनी हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली. पं. जवाहरलाल नेहरु यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेले र्शध्दांजलीपर लेख अजोड मानले जातात. आचार्य अत्र्यांचं लेखन विविधांगी आहे. त्यात प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र व ललित साहित्याचा समावेश आहे.मी कसा झालो ? हशा आणि टाळया या आत्मकथनपर पुस्तकांबरोबरच कर्‍हेचे पाणी या आत्मचरित्राचे पाच खंड त्यांनी लिहिलेल्या विडंबन काव्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. अत्र्यांनी विडंबन या काव्यप्रकाराची फक्त रुजवातच केली नाही, तर या प्रकाराला प्रतिष्ठाही मिळवून दिली. केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी विडंबन काव्य लिहिलं. त्यामध्ये रविकिरण मंडळ तसंच, केशवसुतादी जुन्या कवींच्या काव्यांची रंगतदार विडंबनं आहेत.

No comments:

Post a Comment