Friday 26 October 2018

राज्यात ९0 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

यंदाच्या हंगामात मराठवाडा, खानदेशासह विविध ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने राज्यातील साखर उत्पादन अंदाजापेक्षा १५ ते २0 टक्क्यांनी घटणार आहे. त्यातच हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकताही घटणार असल्याने ९0 लाख टन साखर उत्पादन होईल, असे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
राज्यात सरासरी हेक्टरी ८८ टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल ११६ टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी ९५२ लाख टन ऊस गाळपातून १0७ लाख टन साखर उत्पादन झाले. या वर्षीच्या हंगामातही ९४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. त्यातून साखरेचे उत्पादन १0६ ते १0७ लाख टनादरम्यान असेल. यंदा खोडवा ऊसाचे प्रमाण ६0 टक्के असल्याने सरासरी ९0 टन प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच यंदाच्या हंगामात ११.६२ लाख हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा हे प्रमाण २.६0 लाख हेक्टरने अधिक आहे. या सर्व कारणांमुळे साखरेचे उत्पादन वाढेल असा अंदाज ऑगस्ट महिन्यात सहकार मंत्र्यांनी वर्तविला होता. शेवटच्या टप्प्यात पावसाने पाठ फिरविल्याने ऊसासह विविध पिकांच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याचा अंदाज आहे.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने मराठवाडा, खान्देश, सोलापूर आणि नगर जिल्हय़ातील स्थिती चिंताजनक आहे. या भागात एकूण उसाच्या ४0 टक्के क्षेत्र आहे. अत्यल्प पावसामुळे येथील उत्पादनात ४0 टक्के घट होईल. त्यातच पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी हुमणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादकतेत १0 टक्के घट होण्याचा अंदाज आहे. सरासरी १५ ते २0 टक्के उत्पादनात घट होईल. त्यामुळे यंदा साडेसातशे ते आठशे लाख टन ऊस गाळपातून ९0 ते ९२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल.

No comments:

Post a Comment