सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कोळदुर्ग (पळशी) किल्ल्यावर सुमारे 850 वर्षांपूर्वीचा कन्नड लिपीतील चालुक्यकालीन शिलालेख आढळला आहे. ‘बा रायगड’ परिवाराच्या दुर्गप्रेमींना किल्ल्याची सफाई करताना हा लेख आढळून आला. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर व प्रा. गौतम काटकर यांनी या लेखावर संशोधन करून अभ्यासपूर्ण निष्कर्ष समोर आणले आहेत. या लेखाच्या शोधामुळे जैन धर्मीयांच्या प्रभावाची माहिती मिळते.
खानापूर तालुक्यात पळशी गावच्या हद्दीत कोळदुर्ग हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. गेल्या वर्षीपासून ‘बा रायगड’ दुर्गप्रेमी संस्थेने या किल्ल्याचे सवंर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. या परिवाराचे अरूण पाटील, बाळासोहब पाटील, कृष्णा गुडदे व सहकारी किल्ल्याच्या डागडुजीचे काम करीत आहेत. या किल्ल्यावर जागोजागी जुन्या मंदिराचे अवशेष, वीरगळ, सतीशिळा आढळून आल्या आहेत.हे अवशेष एकत्र करीत असताना भग्न अवस्थेतील एक शिलालेख आढळून आला. या शिलालेखाची माहिती दुर्गप्रेमी अॅड. फिरोज तांबोळी यांच्यातर्फे कुमठेवर व प्रा. काटकर यांना मिळाली. कुमठेकर आणि प्रा.काटकर यांनी किल्ल्यावर जाऊन शिलालेखाचे ठसे घेतले. शिलालेख हा ‘हळेकन्नड’ म्हणजेच जुन्या कन्नड लिपित आहे. शिलालेखाचा सुरूवातीचा भाग भग्न झाला आहे.शिलालेखाच्या उर्वरित भागात मध्यभागी एका आसनस्थ साधूची मूर्ती असून एका बाजूला चंद्रकोर आहे. शिलालेखात सुरूवातीच्या भागात एका जैन मुनींचे वर्णन आहे. या शिलालेखात स्पष्ट कालोल्लेख नसला तरी चालुक्य राजा ‘जगदे्कमल्ल’ या नावाचा उल्लेख आहे. हा राजा इ.स.1138 ते 1150 या दरम्यान राज्य करीत होता. शिलालेख 17 ओळीचा असून काही अक्षरे पुसट झाली आहेत.
सांगली जिल्ह्यात चालुक्य राजाच्या कारकिर्दीत जैन धर्मियांना दान दिलेले शिलालेख बोरगाव (ता.कवठेमहाकाळ), भाळवणी (ता.खानापूर) येथे आढळले आहेत. कोळदुर्गवर सापडलेल्या या नव्या लेखामुळे जिल्ह्यातील जैन धर्मियांच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश पडणार आहे. या संशोधनासाठी त्यांना कन्नड विद्यापीठ (हंपी) येथील संशोधक मार्गदर्शक डॉ. व्ही. एस. माळी यांचे सहकार्य मिळाले.
No comments:
Post a Comment