याचा थेट संबंध शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याशी असल्याने आपल्या इतिहासाशी ते निगडीत आहे. शिवाजी राजांनी सुमारे ५00 दिवस या पन्हाळा किल्यात विजापूरच्या आदिलशाही बळकट वेढय़ात काढले होते आणि अतिशय हुषारीने हा वेढा फोडून त्यांनी विशाळगड गाठला होता तो महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेल्या बलीदानाने. १७८२ साली ही मराठा साम्राज्याची राजधानी होती त्यानंतर १८२७ मध्ये तेथे ब्रिटिशांनी आपले ठाणे उभे केले. सह्याद्रीच्या कडेखांद्यावर असलेला हा गड दख्खन पठारावरील सर्वात मोठा गड आहे.
इतिहास सांगतो की ११७८ ते १२0९ या काळात या गडाचे बांधकाम केले ते शिलाहार भोज दुसरा याने. नंतर हा गड यादवांकडे आला. १६ व्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीने तो आणखी बळकट केला. शिवाजीराजांनी १६५९ मध्ये या गडावर हल्ला करून त्यावर १६७३ पयर्ंत आपली मालकी कायम ठेवली होती. याच गडाला अफझलखानानेही वेढा घातला होता मात्र तो उठवून लावला गेला. संभाजी राजांना याच गडावर कैदेत ठेवले गेले होते व नंतर येथून सुटका करून घेऊन त परत शिवाजीराजांकडे आले. शिवाजीराजांच्या काळात या गडावर १५ हजार घोडे, २0 हजार सैनिक तैनात असत. १४ किमीच्या परिसरात पसरलेल्या या गडाला ११0 माच्या आहेत. अनेक भुयारी मार्ग असलेल्या या गडाचे बांधकाम विजापूर स्टाईलचे असून मोरांची शिल्पे येथे जशी दिसतात तशीच भोज राजाच्या काळातील कमळाची शिल्पेही आहेत. गडाची तटबंदी ७ किमी आहे.
पाराशर गुहा या ठिकाणी महर्षी पाराशर यांचा निवास असे असे सांगतात. करवीर पुराणात यांचा उल्लेख पन्नगालय म्हणजे सर्पांचे निवासस्थान असा येतो. महाराष्ट्राचे आद्यकवी मोरोपंत यांनी येथेच त्यांचे काव्यलेखन केले असेही सांगितले जाते. गांधारबावडी ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर येथे पाहायला मिळते. किल्ल्याला वेढा पडला की पाण्यात पहिले विष कालवले जायचे. मात्र या तीन मजली विहिरीतील पाण्याचे स्त्रोत पाण्याची कमतरता भासू देत नसत. या विहिरीच्या भिंती इतक्या रूंद की सैनिक तेथे आरामात मुक्काम करू शकत तसेच येथील भुयारातून किल्ल्याबाहेरही पडू शकत. किल्ल्यातला किल्ला अशीच या बावडीची ओळख. अगदी मुख्य किल्ला पडला तरी येथे आर्शय घेता येत असे. कलावंती महाल, रंगमहाल अंबरखाना ही ठिकाणे आता कल्पनेने पाहायची कारण त्यांची खूपच पडझड झाली आहे.
धर्मकोठी, धान्यकोठार, सज्जा कोठी तसेच सोमेश्वर, अंबाबाई, महाकाली यांची मंदिरेही येथे आहेत. कोल्हापूरपासून सतत बससेवा या ठिकाणी उपलब्ध आहे. स्वत;चे वाहन असेल तर अधिक चांगले. हिल स्टेशन असल्यामुळे निवासाच्या चांगल्या सोयी आहेत तसेच कोल्हापूरचे खास पदार्थ चाखण्याची व्यवस्थाही उत्तम आहे.
No comments:
Post a Comment